नागपूर, 21 जून : विधान परिषद निवडणुकीमध्ये पानीपत झाल्यामुळे आता महाविकास आघाडी सरकारमध्ये फटाके फुटण्यास सुरुवात झाली आहे. निकालानंतर रात्रभर शिवसेना आणि काँग्रेसची चिंतन बैठका सुरू होत्या. या बैठकींमध्ये आमदारांची नाराजी काही आमदारावर असल्यामुळे घात झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मंत्र्यांवरही खापर फुटण्याची चिन्ह आहे.
विधान परिषद निवडणुकीच्या 10 जागांसाठी अत्यंत चुरशीची निवडणूक सोमवारी पार पडली. या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि शिवसेनेची मत फुटल्याचे दिसून आले. त्यामुळे निकालानंतर रात्रभर चिंतन-मंथन सुरू होते. या बैठकीमध्ये काँग्रेस आमदारांची मंत्र्यांवर असलेली नाराजीचे कारण समोर आले आहे. त्यामुळे आमदारांनी मंत्र्यांचे ऐकले नसल्याने काँग्रेस उमेदवारांचा पराभव झाल्याचे पुढे आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे आमदार हे निधीवरून नाराजी व्यक्त करत आहे. त्यांनी अनेक वेळा आपल्या मंत्र्यांच्या कानीसुद्धा घातले. एवढंच नाहीतर हा वाद हायकमांडपर्यंत सुद्धा गेला होता. पण, काँग्रेसच्या मंत्र्यांनी सगळं काही आलबेल असल्याचं सांगून वादावर पडदा टाकला होता. पण, आता त्याचे परिणाम काँग्रेसला भोगावे लागल्याचे समोर आले आहे. त्यामुळे काही मंत्र्यांवर या पराभवाचे खापर फुटण्याची शक्यता आहे.
दरम्यान, विधान परिषदेतील काँग्रेसचा झालेला पराभव महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचे दिसून येत आहे. निकालानंतर त्यांना माध्यमांशी बोलताना सूचक प्रतिक्रिया दिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. थोरात म्हणाले की, 'हा पराभव धक्कादायक असून सर्वांनीच आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. तसेच ते पुढे म्हणाले की सर्व गोष्टी आपल्या बाजून असतानाही पराभव होत असेल तर सरकार म्हणून विचार करण्याची गरज आहे'
महाविकास आघाडीची 21 मतं फुटली
राज्यसभेप्रमाणे विधान परिषद निवडणुकीतही कुठलीही चूक होऊ नये म्हणून महाविकास आघाडीतील पक्षांनी विशेष काळजी घेतली होती. असे असतानाही आघाडीची एकदोन नाही तर तब्बल 21 मतं फुटली आहे. यात काँग्रेसची 3 मतं फुटल्याचे समोर आले आहे. कारण, काँग्रेसला 44 पैकी फक्त तीन मते मिळाली आहेत. दहाव्या जागेसाठी काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप आमने सामने होते. यात भाई जगताप यांचा विजय झाल्याने चंद्रकांत हंडोरे पराभूत झाले आहेत.
