चंद्रपूर जिल्ह्यातून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. कौटुंबिक कलहातून पतीने चक्क पोटच्या मुलींसह पत्नीची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणातील मारेकरी असलेल्या अंबादास तलमले (वय 50 वर्ष) याने पत्नी अल्का तलमले (वय 40 वर्ष) आणि मोठी मुलगी प्रणाली तलमले (वय 20 वर्ष), लहान मुलगी तेजू तलमले (वय 20 वर्ष) या तिघांची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली आहे. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील नागभिड तालुक्यातील मौशी गावात आज (दि.3) घडली. या तिहेरी हत्याकांडाने संपूर्ण जिल्हा हादरला असून यातील मारेकरी पती अंबादासला पोलिसांनी अटक केली आहे.
तिहेरी हत्याकांडाने संपूर्ण जिल्हा हादरला
प्राप्त माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून तलमले कुटुंबियातील पती अंबादासचे घरी कायम वाद होत होते. दरम्यान, आज पहाटेच्या सुमारस त्यांचातील वाद पुन्हा उफाळून आला. यात अंबादासने घरात शिवीगाळ करत वाद घातला. दरम्यान, या वादातील राग अनावर झाल्याने संतप्त झालेल्या अंबादासने टोकाचे पाऊल उचलले. पहाटेच्या सुमारास घरातील सर्व झोपेत असतांना अंबादासने घरातील कुऱ्हाडीने मुलींसह पत्नी हल्ला केला.
या हल्ल्यात पत्नी अल्का तलमले (वय 40 वर्ष) आणि मोठी मुलगी प्रणाली तलमले (वय 20 वर्ष), लहान मुलगी तेजू तलमले (वय 20 वर्ष) या तिघांची अंबादासने निर्घृण हत्या केली. या थरारक घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले आणि यातील संशयित आरोपी असलेल्या अंबादासला नागभीड पोलिसांनी अटक केली. या तिहेरी हत्याकांडाने संपूर्ण जिल्हा हादरला असून या घटनेचा पुढील तपास सध्या पोलीस करत आहे.
तीन मद्यधुंद युवतींचा बस स्थानकावर तुफान राडा
यवतमाळच्या कळंब येथील बस स्थानक परिसरात तीन मद्यधुंद युवतींनी चांगलाच राडा घातला आहे. दरम्यान, बसस्थानक परिसरातील येणाऱ्या-जाणाऱ्यांना अर्वाच्च भाषेत शिविगाळ करित दोघांना विनाकारण मारहाण केली. या प्रकारामुळे रहदारीचा मोठा अडथळा निर्माण झाला होता. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर चांगलीच व्हायरल होत आहे. या प्रकरणी नागरिकांनी कळंब पोलीस ठाण्यात कळविल्यानंतरही एक तास कुणीच आले नाही. त्यामुळे जवळपास एक तास हा प्रकार असाच सुरू होता. शेवटी पोलीस आल्यानंतर कळंब पोलीसांनी तीनही युवतीवर प्रतिबंधक कारवाई केली.
