महाराष्ट्राच्या राजकारणातील बहुजन समाजाचे बुलंद नेतृत्व, उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. हा आघात सुनामी, भूकंपापेक्षाही कितीतरी पटीने घातक असल्याची भावना सर्वसामान्य जनतेतून व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर विखरण ता. शिरपूर जि. धुळे येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) विधानसभा क्षेत्र तालुका अध्यक्ष दिलीप भाईदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली भावपूर्ण आदरांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी माजी सरपंच प्रविण जगन्नाथ पाटील, विद्यमान सरपंच रुपालीताई कवरदास पाटील यांचे पती कवरदास भाईदास पाटील, विखरण विविध कार्यकारी सोसायटीचे व्हाइस चेअरमन धोंडु झिंगा पाटील, विखरण ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आदरांजली सभेत बोलताना दिलीप भाईदास पाटील म्हणाले,
“महाराष्ट्रातील बहुजन समाजाचे खंबीर नेतृत्व आज हरपले आहे. अजितदादांचा अचानक जाणे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाला बसलेला मोठा आघात आहे. ही हानी भरून न निघणारी आहे.”
यावेळी उपस्थित सर्वांनी दोन मिनिटे मौन पाळून अजितदादांच्या आत्म्याला शांती लाभो अशी प्रार्थना केली. सभास्थळी उपस्थितांचे डोळे पाणावले होते. अनेक माता-भगिनी भावनाविवश झालेल्या दिसून आल्या.
विखरण गावात संपूर्ण दिवस शोकमय वातावरण होते. “दादा पुन्हा येणार नाहीत” या जाणिवेने प्रत्येक मन सुन्न झाले होते. जनतेशी नाळ जुळवून ठेवणारे, तळागाळातील प्रश्नांसाठी लढणारे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना गावकऱ्यांतून व्यक्त होत होती.
हा कार्यक्रम केवळ आदरांजलीपुरता मर्यादित न राहता, अजितदादांच्या सामाजिक, राजकीय कार्याची आठवण करून देणारा भावनिक क्षण ठरला.

