देशभर सध्या उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांची चर्चा आहे. आज या पाचही राज्यांमधल्या निवडणुकांचे निकाल लागणार असून देशातल्या इतर कोणत्याही पक्षापेक्षा काँग्रेस आणि भाजपा या दोन राष्ट्रीय पक्षांमध्ये हा चुरशीचा सामना पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी आजच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसविषयी मोठं भाकित केलं आहे.
गेल्या काही महिन्यांपासून पंजाबमधील राजकारणात मोठी घुसळण सुरू असल्याचं पाहायला मिळालं आहे. आधी नवज्योतसिंग सिद्धू यांची बंडखोरी, त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचा राजीनामा, सिद्धू विरुद्ध चन्नी असा कलगीतुरा आणि नंतर पक्षश्रेष्ठींच्या मध्यस्थीमुळे झालेली समेट या पार्श्वभूमीवर पंजाबमधलं राजकारण चर्चेचा विषय ठरलेलं असताना आता त्याच पंजाबमध्ये प्राथमिक आकडेवारीनुसार आम आदमी पक्ष आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे. यासंदर्भात आता राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी काँग्रेसला गंभीर इशारा दिला आहे.
एनडीटीव्हीवरील चर्चासत्रात बोलताना योगेंद्र यादव म्हणाले, “पंजाबमध्ये आम आदमी पक्ष जिंकला आणि काँग्रेस हरली तर काँग्रेसमध्ये स्फोट होतील. हे कदाचित एका रात्रीत होणार नाही. हळूहळू होईल. पण काहीतरी फार गंभीर घडतंय. मी फक्त अपेक्षा करू शकतो की काँग्रेसच्या नेत्यांना याची कल्पना असावी”.
२०२४मध्ये काय होणार?
दरम्यान, या पाच राज्यांच्या निवडणुकांकडे २०२४च्या सार्वत्रिक निवडणुकांची रंगीत तालीम म्हणूनच पाहिलं जात आहे. या पार्श्वभूमीवर योगेंद्र यादव यांनी हा भाजपासाठी सोपा पेपर होत असल्याचं म्हटलं आहे. “काँग्रेसची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असून २०२४ लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर काँग्रेसची ही अवस्था आणि समोर दुसऱ्या समर्थ आघाडीचा अभाव ही भाजपासाठी अत्यंत सुयोग्य स्थिती असेल”, असं योगेंद्र यादव म्हणाले आहेत.
पंजाबमध्ये एकूण ११७ जागांसाठी मतदान झालं असून बहुमतासाठी ५९ जागा आवश्यक असणार आहेत.
