यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, ८ मार्चला गळय़ाची शस्त्रक्रिया झाल्याने डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला होता. याच दरम्यान मी जिल्ह्याची बदनामी केली असा माझ्यावर आरोप केला गेला. जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत आणि वाढत्या गुंडगिरीबाबत प्रश्न उपस्थित केला तर बदनामी कसली ? सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे जिल्ह्याची बदनामी होत आहे. सत्ता पदाच्या काळात चांगले अधिकारी आणले. कोणालाही सूडबुध्दीने वागवले नाही. विरोधकांचाही द्वेष केला नाही. लोकांचे प्रश्न सोडवले. मात्र अलीकडे राजकारण वेगळय़ा स्तराला गेले असून केवळ आरोप प्रत्यारोप केले जात आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. कोटय़वधींचा निधी आणला पण उद्घाटनाचे श्रेय घेतले नाही. विद्यमान सत्ताधारी आपण आणलेल्या निधीच्या कामांचेच उद्घाटने करत आहेत. कोनशिलेवरील नावापेक्षा जनतेच्या मनातील स्थान आपल्याला महत्त्वाचे आहे असा प्रति टोला पालकमंत्री धनंजय मुंडे यांना लगावला.
कार्यकर्ता मंत्री, आमदार, खासदार झाला पाहिजे
दिवंगत गोपीनाथ मुंडे हे तरुण नेता निर्माण करणारी खाणच होते. अनेकांना त्यांनी संधी दिली. त्यामुळे माझ्याबरोबर काम करणारा कार्यकर्ताही मंत्री, आमदार, खासदार झाला पाहिजे. यासाठी आपला प्रयत्न राहील, असे मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले.
