दहा दिवसांनी दोघांना भादलीच्या गाववेशीवर नेले. दशक्रिया विधीत दोघांना सहभागी केले आणि एका खळ्यातच धनंजयचे मुंडण केले. धनंजयला अंघोळही घातली. धनंजयनेही स्वत:च स्वत:चे दु:ख धुतलं. मन धीट केलं. तेथून त्याला पोलिसांनी राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या अनुरक्षण संघटनेच्या बालगृहात सोडले.
दोघांच्या वेदना ऐकून बाल व निरीक्षणगृहाचे तत्कालीन सचिव दत्तात्रय नथू चौधरी यांचेही मन हळहळले. दोघांनाही कुशीत घेतले आणि काळ्याकुट्ट अंधाराने वेढलेल्या चिमुरड्यांच्या वाटेवर उजेड पेरायला सुरुवात केली. मोनिकाला दुसरीत, तर धनंजयला चौथ्या वर्गात घातलं आणि बघता बघता धनंजय दहावी उत्तीर्ण झाला. तेही ७० टक्के गुणांनी. बालगृह आनंदले. पुढे धनंजय मुंबईतील विद्याविहार आयटीआयमध्ये प्रवेशित झाला. तिथेही तो वेल्डर शाखेत पहिला आला. मोनिकाही सज्ञान झाली. तीही भादलीला परतली.
धनंजय सुटीच्या दिवशी आजी आणि बहिणीला नक्कीच जातो भेटायला.... कधीतरी रक्ताने माखलेल्या घराचे डाग पुसायला...रडेंच्या देवळात आनंदरंग उधळायला अन् बहीणमायेचा आनंद वेचायला....
माह्या माय-बापचा चेहरा लक्षात नाही; पण माह्या मनूचे (मोनिका) पुढल्या वर्षी लगीन करणार आहे. बापूदादाने (संजय चौधरी) आम्हाले इथंवर आणलं. बालगृहानं जगणं भी शिकवलं. - धनंजय रडे, भादली (जळगाव)
धनंजय आणि मोनिका अतिशय प्रामाणिक - मेहनती. शासनाच्या अखत्यारितल्या बालगृहाने पुन्हा एकदा दोघांना आयुष्य वाहिले, नक्कीच त्याचा आनंद आहे. - संजय दत्तात्रय चौधरी, सचिव, अनुरक्षण बालगृह, जळगाव
