बाजार करून परतताना अपघात
अपघात झालेले सदर वाहन किर्ता कागडा रहासे यांचे असून गोरंबाच्या सेगलापाडा येथील प्रवाशांना शहादा येथे बाजारासाठी घेऊन आले होते. घरी परत जात असताना गोरंबा पाटीलपाडाजवळ हलक्या पावसाच्या सरी कोसळत असताना तीव्र उतारावरून वाहन घसरल्याने थेट 50 फूट खोल दरीत कोसळले. यात मानसिंग वळवी (वय 65) या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. सदर रस्त्यावर अद्यापही शासनाकडून डांबरीकरण रस्त्याचे काम केलेले नाही. स्थानिक नागरिकांकडून माती टाकून कच्चा पर्यायी रस्ता तयार करण्यात आला आहे. सदर पाड्याला जोडणाऱ्या रस्त्यांचे काम तात्काळ करावी अशी मागणी नागरिकां द्वारे केली जात आहे.
१४ वर्षांपासून दुरूस्तीच नाही
ग्रुप ग्रामपंचायत गोरंबा मुख्य पाड्याला जोडणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण काम 2008 साली करण्यात आले होते. गेल्या 14 वर्षानंतर या रस्त्यावर कोणतीही दुरुस्ती किंवा नवीन रस्ता तयार करण्यात आलेला नाही. त्यामुळे या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून वारंवार अपघात घडत आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी सदर रस्त्याच्या दुरुस्तीकडे पूर्णतः दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
