मिळालेल्या माहितीनुसार, मेंढी पाळण्यासाठी ३ हजारांत सौदा झालेल्या दिलेल्या एका आदिवासी मुलीचा बेदम मारहाणीमुळे मृत्यू झाला होता. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर हे यामागे संपूर्ण रॅकेट काम करत असल्याचंही उघड झालं आहे. इगतपुरी तालुक्यातील आदिवासी कातकरी पाड्यांवरील ३० चिमुकल्यांचा सौदेबाजार झाल्याची माहिती मिळत आहे. आदिवासी समाजातील मागासलेपण, अशिक्षितपणा, दारिद्र्य याचा फायदा घेऊन काही भामट्यांकडून या चिमुकल्यांची खरेदी केली जाते. एक मेंढी आणि ३ हजार ते ५ हजार रुपयात मुलांचा सौदा केला जातो.
या अमानवीय सौद्यात ६ ते १५ वयोगटातील मुलांची खरेदी-विक्री केली जाते. मेंढ्या वळण्यासाठी नगर जिल्ह्यातील मेंढपाळांकडून ३० मुलांची खरेदी करण्यात आली होती. सौदा झाल्यानंतर या चिमुकल्यांचं आयुष्य गुलामाप्रमाणे होतं. त्यांना त्यांच्या क्षमेतेपेक्षा कितीतरी पटीने अधिक काम दिलं जातं. त्यांना अमानुषपणे मारहाण केली जाते, पुरेसे अन्नही दिले जात नाही. आदिवासींना दारुच्या जाळ्यात अडकवून त्यांच्याकडून मुले खरेदी केली जातात, याप्रकरणी एक एजंट फरार झाला आहे, तर एकाला अकोले पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी अल्पवयीन मुलांना वेठबिगारी, बालमजुरी आणि अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत नाशिक जिल्ह्यातील घोटी आणि नगर जिल्ह्यातील घुलेवाडी तसेच अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर काही मुलांची प्रशासनाकडून सुटका करण्यात आली आहे, तर काहींचा शोध सुरु आहे. आदिवासी बालकांची खरेदी विक्री करणारे हे रॅकेट नाशिक, अकोला, अहमदनगर या जिल्ह्यांत पसरले असल्याचा संशय असून याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
