सात दिवसांपूर्वी पनवेल रेल्वेस्थानकाच्या पूर्वबाजूस (नवीन पनवेल) प्रवासी महिला प्रियंका रावत यांचा रात्री अकरा वाजता खून झाला. या ठिकाणी प्रवाशांची वर्दळ कमी होती मात्र सूरक्षेसाठी पोलीसही नव्हते. पोलीसच नव्हते त्यामुळे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रियंका यांना वैद्यकीय उपचार मिळेपर्यंत त्यांचा मृत्यू झाला. या प्रसंगी पोलीस असते तर हा खून टळला असता, इतर प्रवाशांनी पोलिसांच्या मदतीने प्रियंका यांना रुग्णालयात वेळेत दाखल केले असते. मात्र, घटनेवेळी पोलीसच नसल्याने नागरिकांनी पुढाकार घेतला नाही, अशी शक्यता नवीन पनवेल वसाहतीमधील अश्वत्थामा जेष्ठ नागरिक संघाच्या जेष्ठांनी व्यक्त केली आहे.
पोलीस चौकी उभारण्यासाठी सिडको महामंडळाकडे पत्रव्यवहार
याच अश्वत्थामा संघाच्या जेष्ठांनी २०१२ सालापासून नवी मुंबई पोलीस दल आणि सिडको महामंडळाकडे पत्रव्यवहार करुन रेल्वेस्थानकासमोरील परिसरात पोलीस चौकी व सूरक्षेची मागणी केली होती. ८ वर्षांपूर्वीच (२०१४) सिडको मंडळाने या पोलीस चौकीसाठी स्थानक परिसरात भूखंड आरक्षित केला. मात्र सरकारी काम ८ वर्षे थांब या उक्तीप्रमाणे चौकी उभारण्याचा हा प्रश्न सरकारी लालफीतीच्या कारभारात अडकला आहे.