जिंदाल कंपनीला लागलेल्या आगीत मृत झालेल्या दोन महिला कर्मचारी होत्या. महिमा आणि अंजली असे दोघांची नावे आहे. महिमा यांचे वय २० होते तर अंजली यांचे वय २७ असून दोघांचाही या आगीत मृत्यू झाला आहे. इतर दोघांवर उपचार सुरू आहेत. दोघांच्याही प्रकृतीत सुधारणा होत आहे. तर नाशिक जिंदाल कंपनीमध्ये लागलेल्या आगीत मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत दिली जाणार आहे.
मुख्यमंत्री घटनास्थळी दाखल
नाशिक मुंबई महामार्गावर गोंदे या गावाजवळ जिंदाल कंपनीचा प्लांट आहे. कंपनीत स्पोट झाला तेव्हा त्याची भीषणता इतकी होती की, आसपासच्या २० ते २५ गावांना मोठा आवाज ऐकू आला. कंपनीत साधारणता २००० कर्मचारी असल्याची माहिती मिळाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील घटनास्थळी पोहोचले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जखमींना नाशिकच्या सुयश रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात आता पर्यंत ९ ते १० जखमींना सुयश रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जखमींना चांगले उपचार मिळावेत - अजित पवार
दरम्यान, अजित पवार यांनी देखील जिंदाल आगीवर भाष्य केलं आहे. अजित पवार म्हणाले, 'नशिक जिल्ह्याच्या इगतपुरीतील मुंढेगाव येथे जिंदाल कंपनीच्या प्लांटला आग लागल्याची घटना भीषण आहे. प्लांटमध्ये अडकलेल्या कामगारांची सुखरुप सुटका व्हावी. जखमी कामगारांना त्वरित, चांगले उपचार मिळावेत, यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी संबंधितांना निर्देश द्यावेत. आगीवर लवकरात लवकर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन, पोलिस, प्रशासकीय कर्मचाऱ्यांना यश मिळो, अशी प्रार्थना करतो
