पावसाचा लहरीपणा व रोगराईमुळे पांढरे सोने म्हणून ओळखले जाणारे कापूस उत्पादन धोक्यात आले. शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करत व आर्थिक झीज सोसत कसे तरी कापसाचे पीक हाती घेतले. परंतु, कापसाला चांगला भाव मिळेल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापूस शेतात व घरात साठवून ठेवला आहे. त्यानुसार नगरदेवळा गावातील काही शेतकऱ्यांनी देखील कापूस अद्याप विकलेला नाही.
दोन लाखाचे नुकसान
नगरदेवळा येथील दिवारसिंग राऊळ यांच्या पिंपळगाव शिवारातील शेतातील शेडमध्ये ४८ हजार रुपये किंमतीचा कापूस साठवून ठेवण्यात आला होता. तसेच राजेंद्र राऊळ यांच्या शेतातील गोडाऊनमध्ये उमेश राऊळ यांचा दीड लाख रुपये किंमतीचा कापूस साठवून ठेवला होता. चोरट्यांनी या कापसावर डल्ला मारला. दोन्ही शेतकऱ्यांच्या दोन लाख रुपये किमतीचा २८ क्विंटल कापूस गोडाऊनचे कूलूप तोडून व शेडमधून लंपास करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरदेवळा दूरक्षेत्राचे पोलीस करीत आहेत.
