नवी मुंबईत प्रेम, पुण्यात लग्न; मात्र नवदाम्पत्यासह साक्षीदारांवरही गुन्हा दाखल; काय घडलं असं?

फुले शाहू आंबेडकर
0
महापे परिसरात बालविवाहाचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणातील तरुणाने, त्याचे वय कायद्यानुसार विवाहास योग्य नसताना, त्याने १९ वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंधातून आळंदी येथे जाऊन गुपचूप विवाह उरकला होता. त्यासाठी या तरुणाने त्याचे वय २२ असल्याचा बनावट दाखलाही सादर केला होता. मात्र मुलीच्या वडिलांनी याबाबत आक्षेप घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे या प्रकरणातील नवदाम्पत्यावर आणि त्यांना साक्षीदार असलेल्या त्यांच्या तीन साथीदारांविरोधात तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी बालविवाह प्रतिबंधक कायदा तसेच, बनावटगिरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
दोघांचे वय १९ वर्षे

या प्रकरणातील तरुण-तरुणी हे दोघेही महापे परिसरात एकाच भागात राहण्यास असून दोघांचे वय १९ वर्षे आहे. दोघेही सध्या शिक्षण घेत असून त्यांच्यामध्ये मागील काही महिन्यांपासून प्रेमसंबंध सुरू होते. या प्रेमसंबंधाला त्यांच्या घरच्यांचा विरोध असल्याने त्यांनी १३ जानेवारी रोजी पुण्यातील आळंदी येथे जाऊन एका संस्थेच्या माध्यमातून गुपचूप विवाह केला होता. त्यावेळी त्यांचे तीन साथीदारही या लग्नाला साक्षीदार म्हणून हजर होते. लग्नासाठी मुलाचे वय कायद्याने २१ असणे बंधनकारक असल्याने तरुणाने त्याचे वय २२ असल्याचा कॉलेज सोडल्याचा बनावट दाखला, बनावट आधार कार्ड, पॅनकार्ड आळंदी येथील संस्थेमध्ये सादर केले होते
या कागदपत्रांच्या आधारे आळंदी येथील संस्थेने या दोघांचा विवाह लावून दिला होता. विवाह करून नवदाम्पत्य घरी परतल्यानंतर मुलाचे वय कायद्यानुसार कमी असल्याचा आक्षेप मुलीच्या वडिलांनी घेतला. तसेच, हा बालविवाह असल्याबाबतची तक्रार तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालयाला या बालविवाहासंबंधी चौकशी करून कार्यवाही करण्याबाबत सूचित केले होते. त्यानुसार सहाय्यक बाल विवाह प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी बालविवाह करणारा मुलगा आणि मुलीच्या कागदपत्रांची पडताळणी केली. तसेच, त्यांनी मुलगा शिकत असलेल्या घणसोलीतील कॉलेजकडून त्याच्या वयाबाबत माहिती मागविली.
कॉलेजने या मुलाचे वय १९ वर्षे असल्याची माहिती दिल्याने मुलाने बालविवाह कायद्याप्रमाणे त्याचे वय विवाहास योग्य नसताना विवाह केल्याचे उघड झाले. तसेच, त्याने वय जास्त आहे, हे दाखविण्यासाठी बनावट कागदपत्रेही सादर केल्याचे आढळून आले. त्यामुळे सहाय्यक बालविवाह प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार लग्न करणाऱ्या तरुण-तरुणीविरोधात तसेच, त्यांचा साक्षीदार राहणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी दिली. तसेच, हा गुन्हा आळंदी पोलिसांकडे पुढील तपासासाठी वर्ग करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default