सासरच्यांनी पैशांसाठी छळलं, लेकरांसाठी तिने निमूटपणे सगळं सहन केलं, पण अखेर तिचा संयम सुटलाच

फुले शाहू आंबेडकर
0

जालन्यात एका विवाहित महिलेने सासरच्या मंडळींच्या जाचाल कंटाळून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे दुधना काळेगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हुंड्यासाठी मुलींचा होणारा छळ आणि त्यातून होणारा घरगुती हिंसाचाराच्या अनेक घटना आपल्या कानावर पडत असतात. पैशांच्या हव्यासापायी सासरच्या मंडळींकडून अनेकदा सूनेला त्रास दिला जातो. या सगळ्यातून अनेकदा कौटुंबिक हिंसाचाराचे प्रकार घडतात. असाच एक प्रकार जालना जिल्ह्यात घडला आहे. याठिकाणी सासरच्या मंडळींच्या छळाला कंटाळून एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.परभणी जिल्ह्यातील मुक्ता उर्फ गायत्री भांदरगे (२७) हिचा जालना तालुक्यातील दुधना काळेगाव येथील शिवदास शेषनारायण भांदरगे यांच्याशी रीतिरिवाजप्रमाणे ११ मे २०१५ रोजी विवाह झाला होता. ठरल्याप्रमाणे मुलीच्या घरच्यांनी चांगले लग्न लावून देत,संसार उपयोगी वस्तू देऊन मुलीला सुखी संसारासाठी रवाना केले. लग्नानंतर काही काळ सुखाचा गेला परंतु नंतर पती आणि तिच्या सासरच्या कुटुंबाने आपले रंग दाखवायला सुरुवात केली
गायत्रीचा पती दारु पिऊन मारहाण करु लागला, तिच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. तसेच घर बांधण्यासाठी माहेरकडून १० लाख रुपये घेऊन ये, या मागणीसाठी गायत्रीचा छळ सुरु झाला. सुरुवातीला गायत्री हिने हा त्रास सहान केला. माहेरच्यांच्या डोक्याला ताण नको, तसेच पोटच्या दोन मुलांसाठी तिने काही काळ सगळा त्रास निमूटपणे सहन केला.पण सासरच्यांच्या मागण्या आणि त्रास सुरुच राहिला. या सगळ्या छळाला कंटाळेल्या गायत्रीने एक वेळेस जालन्यातील रेल्वे पटरीवर झोपून आत्महत्येचा प्रयत्नही केला. तिने उचललेल्या टोकाच्या पावलाचा सासरच्या मंडळींवर काहीच परिणाम झाला नाही. उलट गायत्रीला मारहाण करणे,शिव्या देणे,घर बांधण्यासाठी माहेराहून १० लाख रुपये आणण्यासाठी अजून त्रास सुरू झाला.
अखेर गायत्रीच्या उरल्यासुरल्या संयमाचा बांध सुटला आणि तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.तिच्या आत्महत्येने परिसरात शोकाकुल वातावरण झाले असून या गायत्रीची दोन्ही मुलं उघड्यावर पडली आहेत. गायत्रीचा भाऊ शाम अमृत जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कदीम जालना पोलिस स्टेशन मध्ये शेषनारायण बाजीराव भांदरगे यांच्यासह दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गायत्री हिच्या माहेरच्यांनी या कुटुंबीयाला वारंवार समजावण्याचा प्रयत्न केला पण तो असफल झाला. त्यामुळे तिचा होणारा छळ वाढू लागल्याने सासरच्याकडील मंडळींना समज दिली होती.काही वेळा नातेवाईकांची बैठक घेऊन यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता.परंतु, यात कुठलाच फरक पडत नव्हता. सासरच्यांकडून छळ होत असताना नात्यात कटुता येईल म्हणून पोलिसांमध्ये तक्रार दिली नव्हती, असेही मृत विवाहितेच्या नातेवाईकांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default