पती– पत्नीच्या वादात आपल्या पाच महिन्याच्या बाळाचा गळा दाबून जन्मदात्या आईनेच हत्या केल्याची धक्कादायक घटना अहमदनगरच्या कोपरगाव तालुक्यात घडली आहे.
इतकेच नाही तर मृतदेह विहिरीत फेकून अज्ञाताने बाळाला पळवून नेल्याचा बनाव या निर्दयी आईने केला होता. पोलिसांनी आरोपी महिलेला बेड्या ठोकल्या आहेत
सूरज आणि गायत्री माळी हे दाम्पत्य कोपरगाव तालुक्यातील कारवाडी शिवारात वास्तव्यास असून मोलमजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. पती सूरज हा पत्नी गायत्रीवर अनैतिक संबंध असल्याचा संशय घेत असल्याने दोघांमध्ये वारंवार वाद होत होते.
१९ फेब्रुवारीला असाच वाद झाला आणि रागाच्या भरात गायत्रीने आपल्या शिवम नावाच्या अवघ्या पाच महिने वयाच्या बाळाला मारहाण करून गळा दाबून त्याची हत्या केली
अज्ञातांनी पळवून नेल्याचा केला बनाव
बाळाला जीवे मारल्यानंतर मृतदेह जवळच असलेल्या शेतातील विहिरीत फेकून दिला. अज्ञात लोकांनी येऊन मुलाला पळवून नेल्याचा बनाव या निर्दयी आईने केला.
दरम्यान बाळाच्या नातेवाईकांनी त्या अज्ञात इसमांचा परिसरात शोध घेतला. परंतु ते मिळून आले नाही. त्यानंतर नातेवाईकांनी कोपरगाव तालुका पोलीसस्टेशन गाठत तक्रार दिली.
अखेर हत्येची दिली कबुली
घटनेचे गंभीर्य ओळखून पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असता पोलिसांना बाळाची आई गायत्रीवर संशय आला. त्यादृष्टीने तपास करत पोलिसांनी आईची कसून चौकशी केली असता तिनेच हत्या केल्याची कबुली दिली आणि घडलेला प्रकार सांगितला.
दरम्यान घटनास्थळी शिर्डीचे पोलीस उपाधीक्षक संजय सातव, तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दौलतराव जाधव यांनी भेट दिली. याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात मयत बाळाचे वडील सूरज माळी यांच्या फिर्यादीवरून मयत मुलाची आई आरोपी गायत्री माळी हिच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
