शिवसेनेबाबत आज निर्माण झालेल्या परिस्थितीला उद्धव ठाकरे हेच जबाबदार आहे. त्यांनी २०१९ मध्ये भाजपशी युती तोडली नसती तर त्यांच्यावर आज ही वेळ आली नसती. त्यामुळे निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे हे न्यायालयात गेले, तरी त्यांना न्याय मिळणार नाही, त्यांनी जनतेच्या न्यायालयातच जावे,’ असा सल्ला केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी शनिवारी उद्धव ठाकरे यांना यांना दिला.
कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ आठवले यांची पदयात्रा आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. रिपब्लिकन पक्षाने या पोटनिवडणुकीत महायुतीचे उमेदवार रासने यांना पाठिंबा दिला असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. राज्य आणि केंद्रातील भाजप व सहकारी मित्रांच्या सरकारच्या कामामुळेच रासने यांचा विजय निश्चित असल्या असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. या प्रसंगी परशुराम वाडेकर, संदीप खर्डेकर, ॲड. मंदार जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.भारताचे संविधान भाजपकडून धोक्यात आणण्याचे काम केले जात असल्याचा अपप्रचार कॉंग्रेसकडून केला जात आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान मजबूत असून ते कोणीही बदलू शकत नाही, असेही सांगून आठवले म्हणाले, ‘निवडणूक आयोगाने शिवसेनेतील वादाविषयी घेतलेला निर्णय हा लोकशाहीचा आदर करणारा आहे. निवडणूक आयोगाने शेण खाल्ले हे उद्धव ठाकरे यांचे विधान चुकीचे आहे.या निर्णयाच्या विरोधात ते न्यायालयात गेले तरी त्यांना न्याय मिळणार नाही. उद्धव ठाकरे यांना जनतेच्याच न्यायालयात जावे लागेल. आज निर्माण झालेल्या परिस्थितीला उद्धव ठाकरे हेच जबाबदार आहेत. त्यांनी २०१९ मध्ये भाजपशी युती तोडली नसती तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती.उद्धव ठाकरे आणि वंचित आघाडीबाबत विचारले असता आठवले म्हणाले, ‘वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव ठाकरे किती काळ एकत्र राहतील हे सांगता येत नाही.’
