रुद्राक्ष घेण्यासाठी गेले, रुद्राक्षाविनाच परतले; जळगावच्या २ महिलांना मृत्यूनं गाठलं

फुले शाहू आंबेडकर
0

सीहोरला रूद्राक्ष महोत्सवासाठी देशभरातून भाविक दाखल झाले आहेत. अशात महाराष्ट्रातूनही अनेक भाविक मध्य प्रदेशला या उत्सवासाठी गेले आहेत. पण अशात जळगावच्या दोन महिलांचा परत येताना दुर्देवी अंत झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

जळगाव : सीहोरला रूद्राक्ष महोत्सवात तुफान गर्दी झाल्यामुळे गुरूवारीच मोठी चेंगराचेंगरी झाल्याची घटना समोर आली होती. यात एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना व अनेकजण बेपत्ता असल्याचे वृत्त ताजे असतानाच आज पहाटे रुद्राक्ष महोत्सवावरून घराकडे परतणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील भाविकांच्या वाहनाचा मध्यप्रदेशात अपघात झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली. शुक्रवारी ५ वाजेच्या सुमारास घडली.
अपघातात जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर इतर ४ भाविक जखमी झाले आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की यात भााविकांचे वाहन पूर्ण चक्काचूर झाले आहे. शोभाबाई लुकडू पाटील (वय-५२), कमलबाई आत्माराम पाटील (वय-५५) दोन्ही रा. पातोंडा. ता अमळनेर अशी दोन्ही मयत महिलांची नावं असून त्या एकाच कुटुंबातील जेठाणी देरानी आहेत.
अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील भाविकांची ४ वाहने १३ फेब्रुवारी रोजी सीहोरला शिवकथा महापुराण व रूद्राक्ष महोत्सवासाठी गेली होती. याठिकाणी भाविक दोन ते तीन दिवस थांबले. मात्र, रुद्राक्ष घेण्यासाठी झालेली गर्दी आणि चेंगराचेंगरी हे बघून भाविकांनी रुद्राक्ष न घेताच पुन्हा जळगावकडे निघण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास पातोंडा येथील भाविकांची तीन ते चार वाहने जळगावकडे मार्गस्थ झाली.

या वाहनांपैकी एमएच १९ डीव्ही ६७८३ या क्रमाकांचे वाहनावरील चालकाचे पहाटे पाच वाजेच्या सुमारास मध्यप्रदेशातील जुलवानानिया गावाजवळ वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव वाहन झाडावर आदळले. वाहनात एकूण ६ जण होते, त्यापैकी शोभाबाई लुकडू पाटील, कमलबाई आत्माराम पाटील या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या वाहनाच्या मागून गावातील इतर भाविकांची वाहने येत होते, त्यामुळे अपघाताची घटना समोर आली. चार जणांना धुळे येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

एकाच कुटुंबातील दोन महिलांच्या मृत्यूने पातोंडा गाव सुन्न...


अपघाताची माहिती पातोंडा गावात कळाल्यावर मोठी खळबळ उडाली. मयत शोभाबाई व कमलबाई या दोघांचे नातेवाईक मध्यप्रदेशकडे रवाना झाले. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा दोघांचे मृतदेह घेवून नातेवाईक काही वेळाने अमळनेर या गावात पोहचत आहे. मयत शोभाबाई लुकडू पाटील, पश्चात पती एक मुलगा दोन मुली असा परिवार आहे. त्यांचे पती शेती करतात. तर मयत कमलबाई यांच्या पश्चात पती दोन मुलं, एक मुलगी असा परिवार आहे. दोघेही एकाच कुटुंबातील आहेत. दोघांचे पती एकमेकांचे भाऊ आहेत. कमलबाई या जेठाणी तर शोभाबाई देराणी आहेत. एकाच कुटुंबांतील दोघा महिलांचा अपघाती मृत्यूने पातोंडा गाव सुन्न झाले आहे

जळगावच्या तीन वर्षाच्या बालकाचाही मृत्यू


मध्य प्रदेशातील सिहोर जिल्ह्यातील कुबेश्‍वर धाम रुद्राक्ष वाटपाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या रुद्राक्ष महोत्सवात जळगावचे विवेक विनोद भट्ट गुरुवारी पत्नी आणि दोन मुलांसह गेले होते. याच दरम्यान, त्यांचा ३ वर्षांचा मुलगा अमोघ भट्टची तब्येत बिघडली. चालताना तो अधिकच आजारी पडला, जिथे त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, आज शुक्रवारी सकाळी डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केलं. दरम्यान, अमोघ भट या बालकाचा दफनविधी सीहोरमध्येच करण्यात आला असल्याचे मृत बालकाचे वडील विवेक भट यांनी बोलताना सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default