आपल्यातील अनेकांचा पनीर हा अतिशय आवडीचा पदार्थ असतो. घरी काही खास सण किंवा स्पेशल दिवस असला की बहुतेक घरांमध्ये पनीर बनवलं जातं आणि मोठ्या आवडीने खाल्लंही जातं. मात्र, हेच पनीर तुमच्या जीवाशी खेळ तर करत नाही ना? हे तपासणंही आता तितकंच गरजेचं झालं आहे. नुकतंच पिंपरी चिंचवडमध्ये अन्न व सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली आहे.
पिंपरी चिंचवडमधील मे. महाराष्ट्र मिल्क डेअरीवर खंडणी विरोधी पथक आणि अन्न व सुरक्षा विभागातील अधिकाऱ्यांनी छापे टाकले. यावेळी तब्बल 600 किलो केमिकल मिश्रित पनीर जप्त करण्यात आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे, दुधाच्या पावडरमध्ये अॅसिटिक अॅसिड टाकून अतिशय गलिच्छ पद्धतीने हे पनीर तयार केलं जात होतं. मागील अनेक वर्षांपासून हा उद्योग सुरू होता, ही बाबदेखील तपासात समोर आली आहे.
