मूल्यवर्धित कर चुकवल्याप्रकरणी काल ईडीने सांगलीतील पाच व्यापाऱ्यांच्या घर आणि कार्यालयावर छापेमारी केली. ईडीने एकाच वेळी या पाच व्यापाऱ्यांच्या घरी छापेमारी केली. आर्थिक अनियमिततेच्या कारणावरून या पाच व्यापाऱ्यांची ईडीच्या एकूण 60 अधिकाऱ्यांनी कसून चौकशी केली. सकाळी 9 वाजता ईडीचे अधिकारी आले होते. या अधिकाऱ्यांनी रात्री अडीच वाजेपर्यंत ही छापेमारी सुरू होती. विविध कागदपत्रांची छाननी केली जात होती. रात्री अडीच वाजता हे अधिकारी पाचही व्यापाऱ्यांच्या घरातून बाहेर पडले आणि मुंबईकडे रवाना झाले.
बँकेत जाऊनही चौकशी
ईडीच्या 60 अधिकाऱ्यांनी या व्यापाऱ्यांच्या घरी जाऊन चौकशी करतानाच त्यांच्या बँकेत जाऊनही चौकशी केली. या व्यापाऱ्यांचे खाते तपासले. कुणाचे किती खाते आहेत, त्यात किती पैसा आणि या खात्यातून किती देवाणघेवाण झाली. सर्वाधिक रकमेची देवाणघेवाण कधी झाली? ही रक्कम कुणाला दिली? कुणाकडून किती रक्कम आली, आदी तपशील ईडीच्या अधिकाऱ्यांनी बँकेतून घेतल्याचं सांगितलं जात आहे.
जयंत पाटलांशी संबंध नाही
सांगलीतील पेठ येथीलराजारामबापू पाटील सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयातही जाऊन ईडीच्या एका पथकाने या व्यापाऱ्यांच्या खात्याबाबाबत चौकशी केल्याचे समोर आले आहे. मात्र, त्याचा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी काहीच संबंध नसल्याचं सूत्रांनी सांगितलं.
ते व्यापारी कोण?
दरम्यान, ज्या पाच व्यापाऱ्यांच्या घरी आणि कार्यालयावर ईडीने छापेमारी केली. ते पाच व्यापारी कोण? असा सवाल केला जात आहे. या पाचही व्यापाऱ्यांची नावे गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. तसेच या व्यापाऱ्यांच्या घरी ईडीच्या हाती काय लागले? याची काहीच माहिती समोर येत नसल्याने व्यापारी वर्ग भयभीत आणि चिंताग्रस्त झाला आहे.
