नवापूर पोलिस ठाणे हद्दीतील घोडजामने येथील अल्पवयीन मुलगा व पांघरन येथील अल्पवयीन मुलगी पळून जाऊन विवाह करणार आहेत , अशी माहिती नवापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना २६ जूनला माहिती मिळाली. श्री. वारे यांनी ती जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांना कळविली. त्यांनी हा बालविवाह थांबवून अल्पवयीन मुलीच्या पालकांचे समुपदेशन करण्याबाबत सांगितले.श्री. वारे यांनी अक्षता सेलच्या सदस्यांच्या मदतीने तत्काळ घोडजामने व पांघरन येथे जाऊन माहिती काढून अल्पवयीन मुलगा व मुलगी तसेच त्यांच्या नातेवाइकांना पोलिस ठाण्यात आणून अल्पवयीन मुलगा व मुलगी यांना बालविवाहामुळे होणारा त्रास व कायदेशीर बाबी समजावून सांगून त्यांचे समुपदेशन केले. तसेच त्यांनी त्यांचे अर्धवट शिक्षण पूर्ण करून लग्नाचे कायदेशीर वय पूर्ण झाल्यानंतरच लग्न करावे याबाबत समजावून सांगून बालविवाह करण्यापासून परावृत्त केले.
अल्पवयीन मुलगा व मुलगी तसेच त्यांचे आई-वडील यांना ही बाब पटल्याने त्यांनी वयाच्या लग्नाबाबत कायदेशीर वर्षे पूर्ण झाल्यानंतर व शिक्षण पूर्ण करूनच विवाह करणार असल्याची हमी दिली. अल्पवयीन मुलगा व मुलगी व त्यांच्या पालकांना नवापूर पोलिस ठाण्याकडून कायदेशीर नोटीस देण्यात आली आहे.तीस बालविवाह रोखण्यात यशऑपरेशन अक्षतांतर्गत नंदुरबार जिल्हा पोलिस दलातर्फे नागरिकांना बालविवाहाबाबत योग्य ते मार्गदर्शन करून जनजागृती करण्यात येत आहे. सुज्ञ नागरिक गोपनीय पद्धतीने जिल्हा पोलिस प्रशासनाला होत असलेल्या बालविवाहाबाबत माहिती देत असून, बालविवाह रोखण्याचे प्रमाणदेखील वाढलेले आहे.नंदुरबार जिल्हा पोलिसांना ऑपरेशन अक्षतांतर्गत आतापावेतो तब्बल ३० बालविवाह रोखण्यात यश आले आहे, असे जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सांगितले.
