कल्याणच्या दुहेरी हत्याकांडाला अनैतिक संबंधाची किनार, बायकोच्या भावाचा जबाब, प्रकरणाला वेगळं वळण

फुले शाहू आंबेडकर
0
कल्याणमधील मुलाची आणि पत्नीची हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मयत महिलेच्या भावाने पोलिसात जबानी दिली आहे. आरोपी उद्योगपती दीपक गायकवाड याचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याने पत्नीची आणि मुलाची हत्या केल्याची माहिती महिलेच्या भावाने पोलिसांना दिली आहे.
कल्याण : कार्यालयातील महिलेशी असलेले अनैतिक संबंध आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून व्यावसायिक दीपक गायकवाड याने पत्नीसह मुलाची हत्या केल्याची तक्रार मृत अश्विनीच्या भावाने महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात दिलेल्या जबानीत केली आहे. एकीकडे पोलिसांनी आता या दृष्टीनेही तपास सुरू केला आहे. तर दुसरीकडे अनैतिक संबंधाला कडवा विरोध करणाऱ्या पत्नीचा कायमचा काटा काढून निरागस मुलालाही संपविणाऱ्या या क्रूरकर्म्याला कल्याण कोर्टाने 6 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
कल्याण पश्चिमेकडील संतोषी माता रोडला असलेल्या रामबाग लेन 3 येथील ओम दिपालया सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये शुक्रवारी रात्रीच्या सुमारास अश्विनी गायकवाड (32) आणि तिचा मुलगा आदिराज (7) या माय-लेकाची तोंडावर उशी दाबून श्वास कोंडून दीपक गायकवाडने हत्या केली. त्यानंतर पसार झालेल्या या खून्याच्या पोलिसांनी संभाजीनगर येथून मुसक्या आवळल्या. कल्याण कोर्टाने दिलेल्या आदेशांनुसार हा खूनी येत्या ६ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत राहणार आहे.
याच दरम्यान दुर्दैवी अश्विनीचा भाऊ विकेश मोरे (30) याने पोलिसांना धक्कादायक जबानी दिली आहे. सात वर्षांपूर्वी आरोपी दीपक हा पुण्यात नोकरीला होता. त्याने तेथील नोकरी सोडली. त्यानंतर शेअर बाजारात गुंतवणूकीचा उद्योग सुरू केला. अर्थविषयक ज्ञान असल्याने त्याने या उद्योगासाठी निधी रिसर्च फर्म नावाची गुंतवणूक कंपनी स्थापन केली. लोकांना वाढीव व्याजाचे आमिष दाखवून दीपक या कंपनीत गुंतवणूक करत होता. रामबाग गल्ली क्रमांक 4 मध्ये दीपकने लहान मुलांच्या खेळण्याचे दुकान सुरू केले होते. गांधारे येथे नर्सरी शाळा सुरू केली. या सगळ्या व्यवहारांमध्ये कालांतराने दीपक कर्जबाजारी झाला.
आर्थिक विवंचनेतून तो पत्नी अश्विनीला सारखा माहेरहून पैसे आणायला सांगायचा. त्याला आतापर्यंत पाच लाख रूपये दिले आहेत. तरीही तो तिला सारखी मारहाण करत असे. याच दरम्यान दीपकचे एका महिलेशी अनैतिक संबंध जुळले होते. याची माहिती सहा महिन्यांपूर्वी बहिण अश्विनीला समजली होती. सुखाच्या संसारात ही महिला अडगळ ठरणारी होती. त्यामुळे त्या महिलेशी असलेले संबंध तोडण्याचे अश्विनीने दिपकला सांगितले होते. मात्र, पत्नीचे ऐकण्याऐवजी उलट संबंधांत हस्तक्षेप करते म्हणून दीपक अश्विनीला मारझोड करत होता, असे मृत अश्विनीचा भाऊ विकेश मोरे याने त्याच्या जबानीत म्हटले आहे. कर्जबाजारीपणा आणि महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधातून हा सगळा प्रकार घडल्याचे अश्विनीच्या भावाने केलेल्या तक्रारीतून पुढे आले आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश साळवी आणि पोलिस निरीक्षक प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस या संदर्भात चौकस तपास करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default