काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा शनिवारी (दि.16) ठाणे शहरात दाखल होणार आहे. खरेगाव टोल नाक्यावरून राहुल गांधी ( हे ठाणे शहरात प्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या टेंभी नाक्यावरील पुतळ्यास देखील राहुल गांधी पुष्पहार अर्पण करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे राहुल गांधी ठाण्यात आनंद दिघेंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन मास्टरस्ट्रोक खेळण्याच्या तयारीत आह.
भारत जोडो न्याय यात्रेचा मार्ग कसा असणार?
मुंब्रा-कौसा मार्ग कळवा आणि ठाणे असा या यात्रेचा मार्ग असणार आहे. दरम्यान या मार्गावरील कळवा नाक्यावर असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करणार आहेत. याशिवाय त्यानंतर ते ठाण्यातील कोर्ट नाका परिसरात असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास वंदन करण्यासाठी जाणार आहेत.
धर्मवीर आनंद दिघे यांच्या आनंद आश्रम मार्गे टेंभी नाक्यावरुन जांभळी नाका या ठिकाणी राहुल गांधींची एक चौक सभा पार पडणार आहे. त्या नंतर राहुल गांधी यांची न्याय यात्रा तीन हात नाका मार्गे एलबी.एस मार्गे सुप्रसिध्द हॉटेल टीप टॉप या ठिकाणी मुक्काम करणार आहे. दरम्यान, राहुल गांधी 17 तारखेला ते दादर चैत्यभूमी या ठिकाणी जाणार आहेत. यात्रेदरम्यान शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते जमणार आहेत त्यामुळे राहुल गांधी यांच्या न्याय यात्रेदरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.
कंपन्यांना काम देऊन हिस्सा बाँडच्या माध्यमातून वसूल केला
भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान संध्याकाळी भिवंडी येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी या घोटाळ्यावरून भारतीय जनता पक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चौफेर हल्ला केला. ते पुढे म्हणाले की, सीबीआय, ईडी, आयकर विभागाकडून कार्पोरेट कंपन्यांवर दबाव टाकून ही वसुली करण्यात आलेली आहे. एखाद्या कंपनीवर सीबीआय ईडी किंवा आयकर विभागाची कारवाई होते.त्यानंतर ती कंपनी बाँड खरेदी करते हे उघड झाले आहे. काही कंपन्यांना काम देऊन त्यातील हिस्सा या बाँडच्या माध्यमातून वसूल केला आहे.
संस्था भाजपा व आरएसएसच्या शस्त्र बनल्या आहेत
काही कंपन्यांना राष्ट्रीय महामार्ग, रस्ते, टनेलचे कंत्राट दिले त्या कंपन्यांकडूम मोठी वसुली केली आहे. हा गंभीर गुन्हेगारीचा प्रकार असून राष्ट्रद्रोह आहे. या घोटाळ्यात नितीन गडकरींचा सहभाग नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचाच हात आहे. ईडी, सीबीआय, आयकर, निवडणूक आयोग या संस्थांना मोदींनी वसुलीच्या कामाला जुंपले आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात शेल कंपन्यांचा वापर केला आहे. सर्वच्या सर्व यंत्रणाच वसुलीच्या कामाला जुंपल्या आहेत. या संस्था भाजपा व आरएसएसच्या शस्त्र बनल्या आहेत. परंतु भाजपाची कधीतरी सत्ता जाईल आणि त्यावेळी जी चौकशी होईल ती अत्यंत कठोर कारवाई असेल.
