अशाप्रकारचे गुन्हे छत्रपती संभागीनगर जिल्ह्यातही घडले असून, तीच टोळी असल्याचा पोलिसांचा संशय आहे. महापालिकेत व्हॉलमॅन म्हणून नोकरीस असलेले शरद काशीनाथ चौधरी यांचा मुलगा मयूर याचे लग्न करायचे होते. त्याच्या लग्नासाठी मुलगी शोध होते. चौधरी कुटुंबीयांनी मुलाचा बायोडाटा तयार करून नातेवाइकांसह मित्रमंडळींमध्ये प्रसारित केला होता.
१३ फेब्रुवारीला चौधरी यांना पूजा विजय माने या ठगबाज महिलेचा फोन आला. तिने तुमच्या मुलाचा बायोडाटा आम्ही बघितला असून, आमच्याकडे मुलगी आहे. तुम्ही मेहकर (ता. बुलढाणा) येथे येऊन मुलगी बघून घ्या, असे सांगितले. त्यावरून ते मुलगी बघण्यासाठी गेले. मुलगी पसंत पडल्यानंतर पूजा माने यांनी त्यांच्याकडे दोन लाखांची मागणी केली.
मात्र, चौधरी यांनी आम्ही एक लाख रुपये देण्यास तयार असल्याचे सांगत ते लग्नाच्या तयारीला लागले. लग्नाची खरेदी केल्यानंतर १६ मार्चला तरसोद येथील गणपती मंदिरात नातेवाइकांच्या उपस्थितीत मयूर चौधरी याचे नंदिनी गायकवाड हिच्यासोबत विवाह सोहळा पार पडला. या वेळी मुलीकडून पूजा माने, नंदिनीची मैत्रीण नीता अर्जुन गणवार, मावशी, मुलीचा मावसभाऊ हजर होते. लग्न आटोपल्यानंतर चौधरी यांनी पूजा माने हिला एक लाख रुपये दिले.
रात्रीतून नववधू पसार
लग्नकार्य आटोपल्यानंतर सायंकाळी सर्वजण घरी परतले. दिवसभराचा थकवा आल्यामुळे रात्री जेवण करून सर्वजण गाढ झोपले असताना, पहाटे नववधू नंदिनी व तिची मैत्रीण घरात दिसून आल्या नाहीत. त्यामुळे चौधरी कुटुंबीयांनी त्यांचा परिसरात शोध घेतला. मात्र, त्या दोघीही मिळून आल्या नाहीत. पहाटे काळ्या रंगाच्या चारचाकीत बसून नववधू व तिच्या मैत्रीणीला जाताना पाहिल्याचे त्यांच्या शेजारी राहणाऱ्या महिलेने सांगितले.
दलालांचा फोन बंद
नववधूसह तिची मैत्रीण घरातून निघून गेल्याचे चौधरी यांनी पूजा माने यांना सांगितले असता, तिने शोध घेऊन सांगते, असे म्हणत मोबाईल बंद करून ठेवला. बरेच दिवस संपर्क होत नसल्याने चौधरी यांचे साडू रवींद्र चौधरी यांनी शिरूर येथे नववधूसह पूजा माने हिने नंदिनी हिचे वैजापूर तालुक्यातील तरुणासोबत विवाह लावून त्यांची फसवूणक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
