मालेगाव तालुक्यातील अजंगमध्ये अल्पवयीन मुलीचा मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपासून ही मुलगी बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको केला आहे.
नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील अजंग गावातून दोन दिवसांपूर्वी राहत्या घरातून आठ वर्षीय मुलगी बेपत्ता झाली होती. या मुलीचा मृतदेह मोसम नदीच्या काठी असलेल्या विनोद शिरोळे यांच्या विहिरीत आढळून आली. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.
संतप्त ग्रामस्थांचे रास्ता रोको आंदोलन
या घटनेची माहिती मिळताच संतप्त झालेल्या ग्रामस्थ्यांनी नामपूर-मालेगाव रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन सुरु केले आहे. या घटनेची सखोल चौकशी करावी, आरोपीला लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
सप्तशृंगी गडावरून उडी मारत तरुण-तरुणीनं संपवलं जीवन
काही दिवसांपूर्वी सप्तश्रृंगी गडाच्या शीतकड्यावरून उडी मारून प्रेमी युगुलाने जीवन संपवले होते. प्रेमीयुगुलाने 400 फूट खोल दरीत उडी घेत आत्महत्या केली. प्रियांका संतोष तिडके , मंगेश राजाराम शिंदे अशी आत्महत्या केलेल्या तरुण-तरुणीचे नावे आहेत. यानंतर आठवड्याभराने प्रेमीयुगुलाचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आले. गडाच्या पायथ्याला असणाऱ्या भातोडे येथील गुराख्यांनी याची माहिती पोलीस पाटील विजय चव्हाण यांना दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे
