डोंबिवली दुर्घटना: दहा मृतदेह सापडले, तीन जणांची ओळख पटली; सात जणांचा डीएनए चाचणीद्वारे शोध

फुले शाहू आंबेडकर
0
डोंबिवली दुर्घटनेतील दहा मृतदेह सापडले आहेत. यातील तीन जणांची ओळख पटली असून बाकी ७ जणांचा शोध घेत आहेत. १२ जण दुर्घटनेत सापडल्याची पोलिसांनी शक्यता वर्तवली आहे.
ठाणे: डोंबिवली एमआयडीसीतील फेज २ मधील अमुदान कंपनीतील स्फोटाच्या वेळी या कंपनीत कार्यरत दहा, लगतच्या सप्तवर्ण कंपनीत एक आणि कॉस्मॉसमधील एक असे एकुण १२ कामगार या दुर्घटनेत सापडल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे. यापैकी शनिवारपर्यंत दहा जणांचे मृतदेह आणि काही मृतदेहांचे अवशेष ताब्यात सापडले आहेत. त्यापैकी तिघांची ओळख पटली असून अन्य सात जणांची ओळख डीएनए चाचणीद्वारे घेण्याचे काम सुरू आहे. बेपत्ता कामगारांचे नातेवाईक आणि येथे सापडलेल्या मृतदेहांच्या अवशेषावरून त्यांच्याही डीएनए चाचणीद्वारे मृतांची ओळख पटवण्यात येत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल कुऱ्हाडे यांनी दिली.
कंपनीच्या घटनास्थळी अद्यापही एनडीआरएफकडून शोध कार्य सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. डोंबिवली अमुदान कंपनीच्या स्फोटाच्या तिसऱ्या दिवशीही घटनास्थळी नातेवाईकांकडून आपल्या कुटुंबातील व्यक्तीच्या शोधासाठी प्रशासनाकडे साकडे घातले जात होते. बेपत्ता कर्मचाऱ्यांपैकी राकेश राजपूत यांचे कुटुंबिय गेल्या दोन दिवसांपासून त्याचा शोध घेत असूनही राकेश यांचा शोध लागत नव्हता. त्यांच्या शोधासाठी त्यांचे कुटुंबीय कधी पोलीस स्टेशन, रुग्णालय, शवागारही पालथे घालूनही त्यांचा पत्ता लागत नव्हता. शनिवारी घटनास्थळी राकेश यांच्या पत्नीने आक्रमक पवित्रा घेत प्रशासनाला शोधकार्य सुरू करण्यास भाग पाडले.
नातेवाईकांच्या आग्रहामुळे पुन्हा शोध सुरू झाला आणि दुपारी एका कामगाराचा मृतदेह सापडला. हाताची दोन बोटे नसलेल्या हा मृतदेह राकेश यांचा असल्याचे त्यांच्या पत्नीने सांगितले आणि या मृतदेहाची ओळख पडली. त्यामुळे या अपघातात ओळख पटलेले राकेश हे तिसरे कामगार आहेत. या संदर्भात सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल कुऱ्हाडे यांनी या घटनेची माहिती देत आत्तापर्यंत १० मृतदेह आणि मृतदेहाचे अवशेष असून त्या द्वारे त्यांची ओळख पटवली जात असल्याचे स्पष्ट केले. अजूनही बेपत्ता कामगार असल्यास त्याच्या नातेवाईकांनी पुढे येऊन माहिती दिल्यास रविवारीही या भागात शोध कार्य सुरू राहणार असल्याचे पोलीसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
कंपनी मालक मलय मेहताला पोलीस कोठडी
डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान रासायनिक कंपनीतील स्फोटाप्रकरणी कंपनी मालक मलय मेहता याला शनिवारी कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने मेहता याला २९ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मलय मेहता याला अटकेनंतर कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात मानपाडा आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांनी मेहता याची तपास कामाकरीता १४ दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी केली.
आरोपीच्या वकिलांनी कंपनी मालकाने कंपनीतील उत्पादन प्रक्रियेसाठी सर्व प्रकारच्या परवानग्या घेतलेल्या आहेत. त्यात कोणत्याही प्रकारची अनियमितता झालेली नाही, असाही युक्तीवाद केला. मात्र सरकारी वकिलांनी हा गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे. त्यामुळे आरोपीची चौकशी करण्यासाठी पोलिसांच्या मागणीनुसार १४ दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी केली. अखेर न्यायालयाने मेहता याला चार दिवस (२९ मेपर्यंत) पोलीस कोठडी सुनावली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default