एकीकडे राज्य शासनाच्या वतीने वृक्ष लागवड करण्यासह विविध उपयोजनांवर भर दिला जात असताना दुसरीकडे मात्र नंदुरबार जिल्ह्यात वृक्षांची सर्रासपणे कत्तल होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तोडलेली झाडे थेट वखारित नेली जात असून विशेष म्हणजे या ठिकाणी येणाऱ्या झाडांची कुठलीही नोंद नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
संपूर्ण राज्यात तापमानाने मोठ्या प्रमाणावर पारा ओलांडला असून यामुळे उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. दुसरीकडे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्याचे नियोजन राज्य शासनाच्या वनविभागाच्या वतीने करण्यात येत आहे. या वृक्ष लागवडीवर कोट्यावधी रुपये खर्च देखील केले जातात.
वखारीत देण्यात आलेल्या झाडांची नोंद नाही
दुसरीकडे धुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी ग्रामीण भागात झाडांची विनापरवानगी कत्तल केली जात असून तोडलेली झाडे थेट वखारीत नेली जात आहे. विशेष म्हणजे वखारीत देण्यात आलेल्या झाडांबाबत कुठलीही नोंद किंवा त्यांची पासेस नसल्याचा देखील प्रकार समोर येत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. अनेक ठिकाणी झाडे तोडण्यासाठी थेट झाडांना पेटवून देत असल्याचा देखील प्रकार समोर आला आहे.
वखारी तात्काळ चौकशी करण्याची मागणी
याबाबत वनविभाग, महसूल विभाग आणि जिल्हा प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करून देखील कोणतीही दखल घेण्यात आली नसल्याचा ग्रामस्थांनी म्हटले आहे. कोणतीही परवानगी न घेता तोडण्यात आलेल्या झाडांची नोंद नसल्याने निश्चित आकडेवारी देखील समोर येऊ शकली नाही. यामुळे एकीकडे पावसाळ्यात वनविभागाकडून वृक्ष लागवडीचे नियोजन केले जात असले आणि त्यावर कोट्यावधी रुपये खर्च केले जात असले तरी दुसरीकडे मात्र या पद्धतीने झाडांची होणारी कत्तल थांबविण्याचे आव्हान प्रशासनासमोर निर्माण झाले आहे. झाडांची कत्तल थांबवून सुरू असलेल्या वखारी तात्काळ बंद करण्याची देखील मागणी ग्रामीण भागातील नागरिकांकडून केली जात आहे.
