पालघर तालुक्यातील मनोर, पाटील पाडा येथील 108 आदिवासी महिलांची फसवणूक झाली. महिलांच्या नावावर कर्ज काढून त्याचे हप्ते न भरताच सुमय्या यासर पटेल नावाची महिला फरार झालीय. त्यामुळं कर्जाचे लाखो रुपये फेडायचे कसे? अशा विवंचनेत महिला आहेत.काय आहे प्रकरण? : वाडा, पालघर, मनोर आदी ठिकाणच्या खासगी बँका तसंच पतसंस्थांकडून महिलांच्या नावावर कर्ज काढलं जात होतं. त्यासाठी या अशिक्षित आदिवासी महिलांची कागदपत्रं, फोटो वेगवेगळ्या बँकात सादर केले जात होते. कर्ज प्रकरणावर या महिलांच्या सह्या, अंगठे आहेत. सुमय्या या आदिवासी महिलांना तुमच्याकडं घरी काही काम नाही, तर महिलांचे गट बनवा, असं सांगत असे. त्यासाठी ती प्रत्येक महिलेला एक हजार रुपये द्यायची आणि ज्या महिलेच्या नावावर कर्ज काढलंय, त्या महिलेला तीन-चार हजार रुपये द्यायची. त्यातून आदिवासी महिलांना हे एक उत्पन्नाचं साधन आहे असं वाटलं.
विश्वासात घेऊन फसवणूक : सुमय्या या महिलांना विश्वासात घेऊन मिळालेल्या पैशातून कर्जाच्या हप्त्यांची परतफेड करेल असं सांगायची. काही महिलांच्या नावावरचे काही हप्तेदेखील तिने फेडले. त्यामुळं महिलांचा तिच्यावर विश्वास बसत गेला. मात्र, हळूहळू सुमय्यानं हप्ते भरणं बंद केलं. त्यामुळं बॅकेचे अधिकारी कर्ज वसुलीसाठी महिलांच्या घरी येऊ लागले. त्यामुळं महिलांनी सुमय्याच्या घरी जात यासंदर्भात चौकशी केली. परंतु तोपर्यंत तिनं घरातून पळ काढला होता. त्यामुळं आपली आर्थिक फसवणूक झाल्याचं या महिलांच्या लक्षात आलं.
न्यायाची मागणी : याप्रकरणी या महिलांनी पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्याकडं तक्रारी अर्ज करत न्यायाची मागणी केली आहे. तसंच सुमय्या पटेलला खासगी बँकांचे कर्मचारीही मदत करत असल्याचा आरोप या महिलांनी तक्रारीत केलाय. याप्रकरणी फसवणूक झालेल्या महिलांनी पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्याकडं तक्रारी अर्ज दिलाय. तर याबाबत योग्य ती चौकशी करण्यात येईल, तसंच दोषींवर कारवाई करू, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.
