डोंबिवली स्फोटानंतर 8 दिवसांनी ढिगाऱ्यावर आढळलं पॅन कार्ड, पण 'भारत' बेपत्ताच; पतीसाठी पत्नीचे दररोज हेलपाटे

फुले शाहू आंबेडकर
0
डोंबिवली अमुदान कंपनी स्फोटाला आठवडा उलटून गेला. मात्र, अजूनही नातेवाईक बेपत्ता झालेल्यांचा शोधासाठी अमुदान कंपनीजवळ येतात आणि मोठ्या आशेने आपला बेपत्ता झालेला भाऊ ,पती, नातेवाईक यांचा शोध घेतात
मुंबईजवळील डोंबिवली एमआयडीसीत  झालेल्या स्फोटामुळे मुंबईसह महाराष्ट्र हादरला. अमुदान कंपनीतील या भीषण स्फोटात  12 जणांचा मृत्यू झाला असून अजूनही 9 जण अजूनही बेपत्ता असल्याची महिती आहे. मात्र, स्फोट झालेल्या घटनास्थळी जवळपास 25 ते 30 मानवी अवशेष मिळाले आहेत, त्याची डीएनए तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे बेपत्ता असलेल्यापैकी किती जण मृत आहेत, याचा अधिकृत आकडा अद्याप समोर आला नाही. मात्र, बेपत्ता असलेल्या व्यक्तींचे नातेवाईक स्फोट झाल्याच्या ठिकाणी व शासन दरबारी मोठ्या आशेने हेलपाटे मारत आहेत. मात्र, या नातेवाईंकांच्या पदरी निराशाच पडत आहे. त्यातच, स्फोटानंतर बेपत्ता असलेल्या एका व्यक्तीचं पॅन कार्ड  घटनास्थळी आढळून आलं. पण, ती व्यक्ती अद्यापही बेपत्ताच आहे. पतीच्या आठवणीने पीडित पत्नीचे डोळे पाणावल्याचं दिसून आलं.    
डोंबिवली अमुदान कंपनी स्फोटाला आठवडा उलटून गेला. मात्र, अजूनही नातेवाईक बेपत्ता झालेल्यांचा शोधासाठी अमुदान कंपनीजवळ येतात आणि मोठ्या आशेने आपला बेपत्ता झालेला भाऊ ,पती, नातेवाईक यांचा शोध घेतात. काहीतरी सुगावा लागेल, कुठेतरी दिसून येईल, काहीतरी माहिती मिळेल, या उद्देशाने 8 दिवसांपासून घटनास्थळी नातेवाईक व कुटुंबीयांचे हेलपाटे पाहायला मिळत आहेत. भारत जैस्वाल हेही येथील कंपनीत कामाला गेले आणि ते या स्फोटानंतर आजपर्यंत मिळून आलेच नाहीत. भारत यांचे नातेवाईक मोठ्या आशेने दररोज घटनास्थळी येऊन भारत यांचा शोध घेत आहेत. मात्र, येऊन परत फिरण्याशिवाय त्यांच्याहाती काहीच लागत नाही. 
अमुदान कंपनीच्या ढिगाऱ्याखाली भारत जैस्वाल बेपत्ता झाले, 8 दिवसांनंतरच्या शोधाशोधीनंतरही भारत यांचा कुठेही थांगपत्ता नाही. मात्र, त्यांच्याजवळ असलेले पॅन कार्ड त्यांच्या नातेवाईकांना मिळाले आहे. भारत आणि त्यांच्या पत्नी हेमा दोघेही वेगवेगळ्या कंपनीत काम करतात. स्फोटाच्यादिवशी दुपारी जेवणाच्या सुट्टीत भारत यांनी पत्नी हेमा यांस कॉल केला. कॉलवरुन तू जेवली का, मुलगा जेवला का अशी विचारपूस त्यांनी केली होती. भारत यांना गुरुवारचा उपवास होता, त्यामुळे भारत जेवण नाकारता पत्नीची आणि मुलाची विचारपूस करुन पुन्हा कंपनीत कामाला लागले. मात्र, त्यानंतर काही वेळात मोठा स्फोट झाल्याचे हेमाने ऐकले आणि लगेचच पती भारत यांना कॉल केला. पण, स्फोटानंतर भारत यांचा कॉल लागत नाही हे लक्षात आल्याने हेमा यांना काळजीवाहक धक्का बसला. भेदरलेल्या अवस्थेत ओळखीच्या व्यक्तींना नातेवाईकांना कॉल करुन त्यांनी चौकशी केली. मात्र, नियतीला काही वेगळेच मंजूर होते. फोनवरुन शेवटचे बोलणे झाले तेच, आज घटनेला आठवडा उलटून गेला. पण, पती भारत यांचा शोध लागत नसल्याचे दिसून येत. दरम्यान, या स्फोटाच्या ढिगाऱ्यावरच भारत यांचं पॅन कार्ड आढळून आलं आहे, विशेष म्हणजे हे कार्ड स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे, पॅन कार्ड मिळालं, आता भारत कधी मिळतील, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.  
दरम्यान, डोंबिवली एमआयडीसी ब्लास्टच्या ठिकाणी आतापर्यंत 25 ते 30 मानवी अवशेष सापडले आहेत. त्यांची डीएनए चाचणी करुन ओळख पटवण्यात येणार आहे. त्यामुळे बेपत्ता असलेले नागरिक मृत झाले आहेत का, याबद्दल अपडेट पुढील काही दिवसांत येऊ शकेल. एवढ्या मोठ्या प्रमाणात मानवी अवशेष सापडल्याने मृतांच्या संख्येत मात्र मोठी वाढ होणार आहे हे स्पष्ट झालं आहे. 
बेपत्ता कामगाारांना कोणतीही मदत मिळणार नाही
डोंबिवली स्फोटातील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत तर जखमींच्या उपचाराचा खर्च शासन उचलणार असल्याचं मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं आहे. मात्र जे कामगार अद्याप बेपत्ता आहेत त्यांना कोणतीही मदत मिळणार नाही. जर शासनाने विशेष बाब म्हणून परिपत्रक काढलं तर बेपत्ता झालेल्यांच्या नातेवाईकांना मदत मिळू शकते. अन्यथा बेपत्ता झालेल्या कामगारांच्या नातेवाईकांना सात वर्ष मदतीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default