खरीप हंगामासाठी बियाणे खरेदी सुरु आहे. यात काही विक्रेत्यांकडून बोगस बियाणे विक्री करत शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. दरम्यान नंदुरबार जिल्हा हा गुजरात व मध्य प्रदेश सीमावर्ती भागात असल्याने नंदुरबारमध्ये गुजरात व मध्य प्रदेशातून कापसाचे बियाणे विक्रीसाठी आणले जातात. मात्र यातील काही बियाणे हे बोगस निघत असून शेतकऱ्यांची यात फसवणूक होत असल्याने नुकसान होत आहे. यावर कृषी विभागाने कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी पूर्ण झाली असून आता बियाणे घेऊन पेरणी करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे यावेळी बोगस बियाणांची विक्री सर्रास होत असते. त्यासाठी कृषी विभागाने तात्काळ लक्ष देऊन बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली. कृषी विभाग आणि जिल्हा प्रशासनाने बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली नाही; तर आणखीन तीव्र आंदोलन करण्याच्या इशारा ठाकरे गटाच्या वतीने देण्यात आलेला आहे.
