भरपावसात मृतदेह कारखान्यासमोर, तणावाची स्थिती; अखेर कुटुंबियांना प्रत्येकी २५ लाखांची मदत सुपूर्द

फुले शाहू आंबेडकर
0
नागपूरमधील चामुंडी एक्सप्लोसिव्ह स्फोटात मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना ३५ लाखांची मदत देण्यात आली आहे. कुटुंबियांनी मृतांचे मृतदेह भरपावसात कारखान्यासमोर ठेवले होते. तणावाच्या परिस्थितीनंतर मदत देण्यात आली.
धामणा येथील चामुंडी एक्सप्लोसिव्हमध्ये झालेल्या भीषण स्फोटात मृतांच्या कुटुंबीयांना मदत न मिळाल्याने संतप्त गावकऱ्यांनी भरपावसात मृतदेह कारखान्याच्या गेटसमोर ठेवले. त्यामुळे तणावाची स्थिती उद्भवली. अखेर कंपनीने तातडीने प्रत्येकी २५ लाख रुपये मदतीचा धनादेश दिल्यानंतर वातावरण शांत झाले. कंपनीचे २५ लाख आणि शासनाचे १० लाख असे एकूण ३५ लाख रुपयांची मदत मृतांच्या कुटुंबीयांना मिळणार आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्रिद्वय अनिल देशमुख, सुनील केदार आदींनी घटनास्थळाला भेट देऊन मृतकांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
नागपूरपासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या चामुंडी एक्सप्लोसिव्हमध्ये गुरुवारी दुपारी भीषण स्फोट झाला. प्रचंड आवाजाने संपूर्ण परिसर हादरला. मुंबईतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस व प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या. एकाच गावातील पाच तरुणी गेल्याने धामणा गावावर शोककळा पसरली. मृतकांच्या नातेवाइकांना न्याय मिळावा, यासाठी काँग्रेस नेत्या सुनीता गावंडे यांच्या नेतृत्वाखाली अमरावती महामार्गावर आंदोलन करण्यात आले.शुक्रवारी सकाळपासून जिल्ह्यातील नेते घटनास्थळाकडे रवाना झाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री अनिल देशमुख, सुनील केदार यांच्यासह अन्य नेत्यांनी घटनास्थळाची पाहणी करून मदतकार्याचा आढावा घेतला. यानंतर मृतकांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. तातडीने मदत मिळवून देण्याचे आश्वासन गडकरी यांच्यासह अन्य नेत्यांनी दिले. मात्र, सायंकाळपर्यंत कोणतीच मदत न मिळाल्याने गावकरी संतप्त झाले.
दरम्यान, शवविच्छेदनानंतर मृतदेह गावात आणले असता गावकऱ्यांनी थेट चामुंडी कंपनीसमोर नेले. मदत मिळत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत, अशी आक्रमक भूमिका गावकऱ्यांनी घेतली. त्यावेळी जोरात पाऊस सुरू होता. यानंतर अनिल देशमुख यांनी व्यवस्थापनाशी संपर्क साधला.
कंपनीने सर्व मृतकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख रुपयांचे धनादेश दिले. अनिल देशमुख व सुनीता गावंडे यांनी नातेवाइकांना धनादेश सुपूर्द केले. यावेळी रामटेकचे नवनिर्वाचित खासदार श्यामकुमार बर्वे, हिंगणाचे आमदार समीर मेघे, सुनीता गावंडे, जिल्हा परिषद सदस्य भारती पाटील, धामणाचे उपसरपंच मनोहर येळेकर, शिवसेनेचे (ठाकरे गट) राजू हरणे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default