पोलीस अधिकारी असल्याचे सांगून खंडणी उकाळणारी आंतरराज्य टोळी जेरबंद

फुले शाहू आंबेडकर
0
अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी असल्याचे सांगून खंडणी उकळणाऱ्या सहा जणांच्या टोळीला खोपोली पोलिसांनी जेरबंद केले आहे.
अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी असल्याचे सांगून खंडणी उकळणाऱ्या सहा जणांच्या टोळीला खोपोली पोलिसांनी जेरबंद केले आहे. आरोपींकडून २१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या संदर्भात अधिक तपास सुरू आहे.
खोपोलीस तालुक्यातील मुळगाव येथील एका बड्या कंपनीतील उपाध्यक्षांना मोबाईल वर एक फोन आला. तुमच्या कडे फेडेक्स कुरीअर मधून अमंली पदार्थ आणि काही संशयित वस्तू आल्या आहेत. त्याची अंमली पदार्थ विरोधी पथक मुंबई मार्फत चौकशी सुरू आहे. ज्यात अंतराराष्ट्रीय व्यापारी सहभागी आहेत. साडे आठ लाख डॉलर्सचे हे रॅकेट असून, तुम्ही त्यात आरोपी आहात. यातून वाचायचे असेल तर १९ लाख ८१ हजार द्यावे लागतील असे सांगत सर्व रक्कम वेगवेगळ्या खात्यांवर वळती करून घेण्यात आली.आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच संबधित कंपनीच्या उपाध्यक्षाने याबाबत खोपोलीस पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात भादवी कलम ३८८, ४२०, ४१९, ३८४, ४६५, ४६८, ४७१, ४८४, १२० (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाच्या सखोल तपासाचे निर्देश पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे आणि अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांनी दिले होते. खालापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोलीस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शितल राऊत या प्रकरणाचा तपास करत होते. यासाठी अभिजित व्दारांबळे यांच्या नेतृत्वाखाली एका विशेष तपास पथकाची नेमणूक करण्यात आली होती.
सुरवातीला ज्या खात्यांवर खंडणीची रक्कम वळती करण्यात आली होती. त्या खातेदारांचा शोध घेण्यात आला, यानंतर सुरत येथून खातेदारास ताब्यात घेण्यात आले. त्यांने खात्याशी संबंधित दस्तऐवज ज्या आरोपींना दिले होते त्यांचा शोध घेण्यात आला. त्यांना गुजरात मधील सुरत, गांधीनगर व अहमदाबाद या ठिकाणाहून अटक करण्यात आली. मुख्य सुत्रधारासह एकूण सहा जणांना ताब्यात घेण्यात आले.
यानंतर त्यांच्याकडून एकूण ९,९७,०००/- रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली. या शिवाय गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेले एकूण १६ मोबाईल फोन्स हस्तगत करण्यात आले. याशिवाय आरोपींकडे असलेली वाहन पोलिसांनी जप्त केली. हे सर्व आरोपी टेलिग्राम या मोबाईल अॅपवरुन एकमेकांच्या संपर्कात होते. ज्या दिवशी गुन्हा पडला त्या दिवशी मुख्य सुत्रधाराच्या आयसीआयसीआय बँक खात्यावर १ कोटी ६१ लाख ३६ हजार ०१८ रुपयाची तर आरबीएल बैंक खात्यावर १ कोटी ५० लाख ५६ हजार ८६० रुपये इतक्या मोठ्या रक्कमेचे व्यवहार झाल्याचे दिसून येत आहे. या सर्व व्यवहारांचा तपास पोलीसांनी सुरू केला आहे. पोलीस अधिकारी असल्याचे बनाव करून लोकांकडून खंडणी उकळण्याचा उद्योग या सहा जणांकडून सुरू होता. अशाच पद्धतीने आणखी किती लोकांना यांनी फसवले आहे या शोध आता पोलीस घेत आहेत.
दरम्यान, नागरीकांना अशा प्रकारे धमक्या येत असतील, खंडणी मागितली जात असले तर त्यांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात न घाबरता तक्रार द्यावी, कोणालाही पैसे देऊ नयेत असे आवाहन पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default