शनिवार (दि. ६) रोजी रात्री ९ ते १० दरम्यान अनेक नागरिकांनी या वन्यप्राण्याचे हालचाली मोबाईल कॅमेऱ्यात कैद केल्या. व्हिडिओ व्हायरल होताच वसाहतीत दहशत निर्माण झाली
५०० क्वॉर्टर, २ हजार नागरिकांचे जीव धोक्यात!
एसआरपीएफच्या शासकीय वसाहतीत जवळपास ५०० सदनिका असून एक ते दोन हजार नागरिक राहतात. यात एसआरपीएफ कर्मचारी, त्यांची कुटुंबे, महिला, वृद्ध, लहान मुले मोठ्या प्रमाणावर आहेत. संध्याकाळी भरभरून गर्दी असणाऱ्या उद्यानाजवळच बिबट्याचा वावर असल्याने पालकांनी मुलांना घराबाहेर पडूच देत नाही.
“सायंकाळीनंतर बाहेर पडायलादेखील नागरिक धजावत नाहीत,” अशी प्रत्यक्षदर्शींची भीतीदायक प्रतिक्रिया.
जंगल, मोकळा परिसर असल्याने वन्यप्राण्यांचा वारंवार वावर
एसआरपीएफ परिसराच्या आजूबाजूला दाट झाडी व मोकळा परिसर असल्याने इथे बिबट्यासह अनेक वन्य प्राणी अधूनमधून आढळतात.
गेल्या वर्षीदेखील प्रियदर्शनी जिमखाना भागात बिबट्या दिसून आला होता. त्यावेळी वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याला पकडून जंगलात सोडले होते.
शिवसेनेचा इशारा: “तातडीने कारवाई न केल्यास आंदोलन!”
घटनास्थळी भीतीचे वातावरण निर्माण झाल्यानंतर शिवसेनेच्या (शिंदे गट) शिष्टमंडळाने उपवनसंरक्षकांना लेखी निवेदन देऊन तातडीने पिंजरा लावण्याची,
ड्रोनद्वारे शोधमोहीम सुरू करण्याची,
अतिरिक्त पोलीस व वनरक्षक तैनात करण्याची मागणी केली आहे.
“कृती न केल्यास आंदोलन करू,” असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी संजय वाल्हे, माधवराव विसपुते, अस्लम खाटीक, किरण आगलावे, सागर राजपूत आदींसह कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.
वनविभागाचे स्पष्टीकरण – “गस्त वाढवली, प्राथमिक उपाय सुरू”
या प्रकरणावर वन परीक्षेत्र अधिकारी भूषण वाघ यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले—
“माहिती मिळताच आमचे पथक घटनास्थळी दाखल झाले. गस्त घालण्यात आली असून प्राथमिक उपाययोजना केल्या आहेत. अद्याप प्रत्यक्ष बिबट्याचा मागोवा लागलेला नाही. यापूर्वी दोन वेळा नागरिक वस्तीत दाखल झालेल्या बिबट्यांना यशस्वीपणे पकडले होते. नियमानुसार त्यांना जंगलात सोडण्यात आले आहे. आता एसआरपीएफ परिसरातही आवश्यक ती खबरदारी घेत आहोत.”
नागरिकांचा संताप – “प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत!”
पुन्हा पुन्हा बिबट्याचा वावर दिसूनही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
“कुटुंबाच्या सुरक्षेसाठी भीतीत जीवन जगण्याची वेळ येऊ नये. प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत,” अशी जोरदार मागणी रहिवाशांकडून करण्यात आली आहे.
