नोकरीच्या गोड आमिषामागे लपलेला अमानुष कट उघडकीस आला आहे. नाशिक शहरातील सातपूर परिसरात राहणाऱ्या, पतीपासून वेगळी राहणाऱ्या आणि अवघ्या तीन-चार महिन्यांच्या बाळाची आई असलेल्या विवाहित महिलेचा ‘इव्हेंट मॅनेजमेंट’मध्ये काम देण्याच्या बहाण्याने दोन लाख रुपयांत सौदा करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इतकेच नव्हे, तर तिला नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे जबरदस्तीने विवाहासाठी भाग पाडण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
नोकरीचे स्वप्न… आणि फसवणुकीचा सापळा
२७ फेब्रुवारी रोजी ‘राणी’ आणि ‘भागी’ नावाच्या दोन महिला एजंटांनी पीडितेशी संपर्क साधला. “इव्हेंटचे चांगले काम मिळवून देतो, महिन्याला भरघोस पगार मिळेल,” असे आमिष दाखवत तिचा विश्वास संपादन करण्यात आला. परिस्थितीने हतबल झालेल्या महिलेने या प्रस्तावाला होकार दिला; मात्र तिला कल्पनाही नव्हती की ती थेट सापळ्यात अडकत आहे.
तिला कारमध्ये बसवून मालेगावमार्गे थेट नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे नेण्यात आले. तेथे नवनाथ खिरडकर नावाच्या तरुणाकडून दोन लाख रुपये घेत तिच्या इच्छेविरुद्ध विवाह लावण्यात आल्याचा आरोप आहे. विवाहानंतर तिला दबाव, भीती आणि धमक्यांच्या छायेत ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
300 ग्रामस्थांचा वेढा… पोलिसांची धाडसी कारवाई
२८ फेब्रुवारी रोजी पीडितेने कसाबसा मोबाईलवरून आईशी संपर्क साधत संपूर्ण प्रकार सांगितला. कुटुंबीयांनी तत्काळ सातपूर पोलिस ठाण्यात धाव घेतली. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांचे विशेष पथक तातडीने जातेगावकडे रवाना झाले.
तेथे पोहोचल्यावर सुमारे ३०० स्थानिकांचा जमाव पोलिसांसमोर उभा ठाकला. परिस्थिती तणावपूर्ण बनली; मात्र पोलिसांनी संयम, कायदेशीर अधिकार आणि धाडसाच्या जोरावर जमावाला बाजूला सारत महिलेची सुरक्षित सुटका केली. या कारवाईमुळे संभाव्य अनर्थ टळल्याचे सांगितले जाते.
दोन अटकेत, सहा जण फरार
या प्रकरणात राणी आणि भागी या दोघींना अटक करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात आणखी सहा जणांचा सहभाग उघडकीस आला असून ते फरार आहेत. पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. या मागे मोठे रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता तपासात नाकारलेली नाही.
झोन २ चे पोलिस उपायुक्त किशोर काळे यांनी सांगितले की, “प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. महिलांच्या सुरक्षिततेशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.”
महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
नोकरीच्या नावाखाली महिलांची फसवणूक करून त्यांचा ‘सौदा’ केल्याच्या या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले आहे. आर्थिक अडचणी, वैयक्तिक संकट आणि नोकरीची गरज यांचा गैरफायदा घेत अशा टोळ्या महिलांना जाळ्यात ओढत असल्याचे चित्र समोर येत आहे.
सध्या गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणातून आणखी धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता पोलिस सूत्रांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, महिलांनी अपरिचित व्यक्तींच्या नोकरीच्या ऑफरवर त्वरित विश्वास ठेवू नये, अशी सूचनाही पोलिसांकडून करण्यात आली आहे.

