शिरपूर तालुक्यात स्मार्ट मीटर बसविण्याच्या कामावरून वाद निर्माण झाला असून, काही ठिकाणी ग्राहकांवर स्मार्ट मीटर बसविण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे वीज वितरण यंत्रणा आणि नागरिकांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
माहितीनुसार, शिरपूर तालुक्यातील काही भागात स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू आहे. मात्र, हे मीटर बसविणे बंधनकारक नसतानाही संबंधित कॉन्ट्रॅक्टर, इंजिनिअर आणि MSEB चे काही अधिकारी ग्राहकांना जबरदस्तीने मीटर बदलण्यास सांगत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. ग्राहकांनी याबाबत नाराजी व्यक्त करत ही पद्धत बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे.
यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला इशारा दिला आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, शासनाचे धोरण आणि कायदेशीर प्रक्रिया पाळल्याशिवाय कोणत्याही नागरिकावर स्मार्ट मीटर बसविण्याचा दबाव टाकणे चुकीचे आहे.
पक्षाचे तालुका अध्यक्ष व्यंकटेश हिलाल पाटील यांनी सांगितले की, “स्मार्ट मीटर बसविण्याबाबत शासनाचे स्पष्ट धोरण आहे. मात्र काही ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी नागरिकांना घाबरवून किंवा दबाव टाकून मीटर बदलण्यास भाग पाडत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. ही बाब अत्यंत गंभीर असून नागरिकांच्या अधिकारांवर गदा आणणारी आहे.”
यावेळी विधानसभा क्षेत्र तालुका अध्यक्ष दिलीप भाईदास पाटील यांनीही प्रशासनाला इशारा देत सांगितले की, “जर नागरिकांवर जबरदस्ती केली जात असेल तर त्याविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल. शासनाच्या नियमांचे पालन करूनच काम झाले पाहिजे. अन्यथा संबंधित अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरवर कारवाईची मागणी करण्यात येईल.”
या बैठकीत स्मार्ट मीटरच्या अंमलबजावणीबाबत पारदर्शकता ठेवावी, नागरिकांना योग्य माहिती द्यावी तसेच सुरक्षा आणि तांत्रिक बाबींबाबत शंका दूर कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली.
यावेळी मच्छिन्द्र वंजी गुजर (उपाध्यक्ष, शिरपूर), ज्ञानेश्वर धुडकू पाटील (तालुका सचिव), मोहन दौलत कोळी (ता. उपाध्यक्ष, शिरपूर), राजेंद्र साहेबराव पाटील (बलकुवा), प्रल्हाद पाटील (जिल्हा उपाध्यक्ष), रोहित कुमार पाटोळे, रब्बा रोहिल्ला पवार, ज्ञानेश्वर भील, कथु भील, अब्दुल वंजीर फकीर, गणेश वेडू पाटील यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, या प्रकरणामुळे शिरपूर तालुक्यातील वीज ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेबाबत प्रशासनाने स्पष्ट भूमिका जाहीर करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
(टीप : शासनाच्या धोरणानुसार स्मार्ट मीटर योजना टप्प्याटप्प्याने राबविण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र कोणत्याही प्रकारे जबरदस्ती अथवा दबाव टाकण्याच्या तक्रारी आल्यास संबंधित विभागाकडून चौकशी होऊ शकते.
