संसारात खटके उडाले की थेट पोलीस ठाण्यात तक्रारी येतात. अनेकदा विवाहित महिला तक्रार करून पती व सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी आग्रह करते.
संसारात खटके उडाले की थेट पोलीस ठाण्यात तक्रारी येतात. अनेकदा विवाहित महिला तक्रार करून पती व सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी आग्रह करते. परंतु, पुरुषांच्या बाबतीत थोडे उलट आहे. सामाजिक बदनामीपोटी अनेक जण पत्नीविरूद्ध तक्रार देत नाहीत. परंतु, सहनशक्तीच्या पलीकडे गेल्यानंतर मात्र पतीसुद्धा पोलिसात तक्रार करायला लागले आहेत. गेल्या पाच वर्षांत ९९८ पत्नींविरुद्ध पतींनी भरोसा सेलकडे तक्रारी केल्या आहेत. सर्वाधिक तक्रारी २०१७ मधील आहेत.
विवाहबाह्य संबंध, व्यसनामुळे विसंवाद
पतीचे किंवा पत्नीचे विवाहबाह्य संबंध कौटुंबिक हिंसाचारासाठी जास्त कारणीभूत ठरत आहेत. पतीवर असा आळ घेऊन बाहेर अनैतिक संबंध असल्याचा संशय घेण्याची वृत्ती महिलांमध्ये बळावत आहे. यासोबतच दारुचे व्यसन असल्याचे सांगून नेहमी पतीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते. या कारणांमुळेही संसार दुभंगत आहेत
मोबाईलचा अतिवापर भोवतोय
समाज माध्यमांचा अतिवापर आणि मोबाईलमध्ये डोके खूपसून बसण्याचे व्यसन अनेक महिलांमध्ये आढळून येते. त्यामुळे पती, मुले किंवा सासरच्या मंडळींकडे त्यांचे नकळत दुर्लक्ष होते. यासोबतच एकमेकांच्या चारित्र्यावर संशय हासुद्धा मोठा घटक कौटुंबिक हिंसाचारासाठी कारणीभूत ठरत असल्याचे पोलिसांचे निरक्षण आहे.
अनेक पुरुष त्यांच्या पत्नीकडून छळ झाल्याच्या तक्रारी भरोसा सेलकडे करतात. अशा नाजूक प्रकरणात दोघांचेही समुपदेशन करून गुंता सोडविण्याचा प्रयत्न केला जातो. कुटुंब, मुलांचे भविष्य याचा विचार करायला भाग पाडून कायदेशीर मार्गाने पुरुषांच्या तक्रारींचे समाधान करण्यात येते. – सीमा सुर्वे
(पोलीस निरीक्षक, भरोसा सेल)
