स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, तांबेकर हे महापालिकेत काम करीत होते. त्यांच्या घरी एक लहान भाऊ व दोन भाच्या आहेत. घरी पाहुणे असल्याने शुक्रवारी सर्वांसाठी त्यांनी भोजन ठेवले होते. मा
त्र, त्यापूर्वीच ही घटना घडली आणि क्षणात सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली. याप्रकरणी हुडकेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खराब रस्त्यामुळेच बळी!
रमेश तांबेकर यांचा बळी येथील खराब रस्त्यानेच घेतला असल्याचा आरोप या भागातील सामाजिक कार्यकर्त्या अंजू घोळवे यांनी 'मटा'शी बोलताना केला. या भागात दोन मोठ्या शाळा आहेत. त्यामुळे सकाळपासूनच स्कूलबसेस, ऑटो व्हॅन यांची वर्दळ असते. अनेक पालक आपल्या वाहनांनी तर कित्येक विद्यार्थी सायकलने शाळांमध्ये जात असतात. मात्र, या रस्त्याची अवस्था दयनीय आहे. दोन वर्षांपूर्वीच येथील रस्त्याला मंजुरी मिळाली. मात्र, बेस्यापासून घोगलीच्या पुलापर्यंतच सिमेंट मार्ग झाला, पुढील मार्ग पूर्ण करण्यातच आला नाही. या अरुंद रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी खड्डे आहेत. त्यामुळे छोटे-मोठे अपघात येथे नेहमीच होत असतात. सकाळी आणि शाळा सुटण्याच्या वेळी तर परिसरातील नागरिकांना जीव मुठीत घेऊनच रस्त्यावर निघावे लागते. तांबेकर यांचा मृत्यू प्रशासनाच्या बेपर्वाईनेच झाला त्यामुळे हा रस्ता न होण्यास जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी व तातडीने या मार्गाचे रुंदीकरण करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
