नव्या घरात राहण्याचे स्वप्न चिरडले

फुले शाहू आंबेडकर
0
मोठ्या उत्साहाने त्यांनी घर बांधले होते. नवे घर, नवा परिसर, नवे शेजारी यांच्यासह राहण्याची कितीतरी स्वप्ने त्यांनी रंगविली होती. मात्र, जर्जर झालेला रस्ता आणि त्यावरील भरधाव टिप्परने त्यांची सारी स्वप्ने चिरडून टाकली. दोन दिवसांपूर्वीच घराचे वास्तू झाले. शुक्रवारी घरापासून काही अंतरावरच झालेल्या भीषण अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रमेश तांबेकर (वय ५४) असे मृतकाचे नाव आहे. बेसा-वेळा हरी मार्गावर घोगली येथील वेदनगरात तांबेकर यांनी घर बांधले होते. २३ मार्च रोजी त्यांच्या घराचे वास्तुपूजन झाले. त्यामुळे घरी पाहुणेही आले होते. शुक्रवारी दुपारी मदने नावाच्या मित्रासह ते स्कुटीवर मानेवाड्याला गेले. दुपारी २ वाजताच्या सुमारास घरी परतत असताना घोगलीच्या आधी असलेल्या नाल्याच्या पुलाजवळ त्यांच्या स्कुटीला एका भरधाव टिप्परने (एमएच ४०- बीजी ४०८६) धडक दिली. या अपघातात मागे बसलेल्या तांबेकर यांच्या डोक्याला गंभीर इजा होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर सोबतचे मदने जखमी झाले. अपघात होताच टिप्परचालक वाहनासह पळून गेला. हा अपघात पाहून जमलेल्या गर्दीतील लोकांनीच पोलिसांना फोन करून या अपघाताची माहिती दिली.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, तांबेकर हे महापालिकेत काम करीत होते. त्यांच्या घरी एक लहान भाऊ व दोन भाच्या आहेत. घरी पाहुणे असल्याने शुक्रवारी सर्वांसाठी त्यांनी भोजन ठेवले होते. मा
त्र, त्यापूर्वीच ही घटना घडली आणि क्षणात सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली. याप्रकरणी हुडकेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  खराब रस्त्यामुळेच बळी!

रमेश तांबेकर यांचा बळी येथील खराब रस्त्यानेच घेतला असल्याचा आरोप या भागातील सामाजिक कार्यकर्त्या अंजू घोळवे यांनी 'मटा'शी बोलताना केला. या भागात दोन मोठ्या शाळा आहेत. त्यामुळे सकाळपासूनच स्कूलबसेस, ऑटो व्हॅन यांची वर्दळ असते. अनेक पालक आपल्या वाहनांनी तर कित्येक विद्यार्थी सायकलने शाळांमध्ये जात असतात. मात्र, या रस्त्याची अवस्था दयनीय आहे. दोन वर्षांपूर्वीच येथील रस्त्याला मंजुरी मिळाली. मात्र, बेस्यापासून घोगलीच्या पुलापर्यंतच सिमेंट मार्ग झाला, पुढील मार्ग पूर्ण करण्यातच आला नाही. या अरुंद रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी खड्डे आहेत. त्यामुळे छोटे-मोठे अपघात येथे नेहमीच होत असतात. सकाळी आणि शाळा सुटण्याच्या वेळी तर परिसरातील नागरिकांना जीव मुठीत घेऊनच रस्त्यावर निघावे लागते. तांबेकर यांचा मृत्यू प्रशासनाच्या बेपर्वाईनेच झाला त्यामुळे हा रस्ता न होण्यास जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी व तातडीने या मार्गाचे रुंदीकरण करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default