नवरा बायकोची भांडणं, जळगावात वर्षाला १८०० तक्रारी, बदललेल्या परिस्थितीचं भीषण वास्तव

फुले शाहू आंबेडकर
0
जळगाव: पूर्वीच्या काळी 'जिना मरना तेरे संग', याप्रमाणे १०० वर्षांपर्यंत संसार टिकत असल्याची आजही अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. मात्र, काळ बदलला तसं सामाजिक चित्रही बदलतं, सद्यस्थितीत १०० वर्षांचा संसार आता १५ दिवसांवर येऊन ठेपलेला असल्याचे विदारक चित्र आहे. जळगावातील महिला सहाय्यक कक्षात वर्षाला १८०० हुन अधिक पती-पत्नीच्या वादाच्या तक्रारी येत असल्याचे गंभीर वास्तव आहे. यात शुल्लक शुल्लक कारणांमुळे संसार मोडले जात असल्याचीही शोकांतिका असून लग्नानंतर अवघ्या काही दिवसातच वधू-वराला पोलिसांची तसेच कोर्टाची पायरी चढावी लागत आहे.
महिला सहाय्यक कक्षातील तक्रारीचे वाढते प्रमाण यामुळे जागा अपूर्ण पडत होती. त्यामुळे जिल्हा पोलीस दलातर्फे सहाय्य कक्षाची नवीन वास्तू बांधण्यात आली. या वास्तूचे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या हस्ते शुक्रवारी (२० मे) उद्घाटन पार पडले.
दररोज पती-पत्नीच्या भांडणाच्या ५० ते १०० तक्रारी

काळ बदलला त्याप्रमाणे सामाजिक चित्रही बदलली आहे. तरुण तरुणांमध्ये सहनशक्ती कमी होत असून लग्नानंतर अवघ्या काही दिवसातच क्षुल्लक कारणांवरून त्यांच्या संसारात वितुष्ट पडत असल्याचे जळगावातील महिला  सहाय्यक कक्षात दररोज होणाऱ्या तक्रारीवरून समोर आले आहे. या महिला सहाय्यक कक्षात दररोज पती-पत्नीच्या भांडणाच्या जवळपास ५० ते १०० तक्रारी येत आहेत. वर्षाला पती पत्नीच्या पत्नीच्या भांडणाच्या तक्रारींचा हा आकडा १८०० एवढा आहे. त्यातून ४० ते ५० टक्के एवढ्याच तक्रारींमध्ये तडजोड होत असून उर्वरित तक्रारींमध्ये थेट गुन्हे दाखल केले जात आहेत. आलेल्या तक्रारी समजून त्याचा चौकशी अभ्यास करून जास्तीत जास्त पती-पत्नीच्या भांडणांमध्ये तडजोड करण्याचा महिला सहाय्य कक्ष प्रयत्नशील असतो.
हुंड्याला बंदी आहे. मात्र, या आधुनिक काळातही पैशांच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ केला जात असल्याच्या अनेक तक्रारी तर आहेच. मात्र, मोबाईलच्या वापरावरून तसेच शूल्लक शुल्लक कारणांवरून संसारांमध्ये वितूष्ट पडत असल्याच्या अनेक तक्रारी तसेच पती-पत्नीच्या संसारात मुलीच्या आईचा हस्तक्षेप अशा अनेक कारणांवरून वाद विकोपाला जावून दररोज ५० ते १०० तक्रारी महिला सहाय्यता कक्षात येत असल्याचेही वास्तव आहे. यात दोन्हीकडील कुटुंबियांना बोलावून त्यांचे समुपदेशन करून जास्तीत जास्त प्रकरणांमध्ये तडजोड करण्याचा प्रयत्न महिला सहाय्य कक्षाकडून केला जात असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले म्हणाले. मात्र, अनेकदा समुपदेशनंतरही दोघांमध्ये समझोता न झाल्याने अशा प्रकरणांमध्ये थेट गुन्हे दाखल केले जात असल्याचेही म्हणाले.
गुन्ह्यांचा तपासाबरोबरच महिला सहाय्य कक्षातील तक्रारींचे निवारण करण्याचा अतिरिक्त ताण पोलीस कर्मचाऱ्यांवर आहे. त्यांच्याकडून तडजोडीवर भर दिला जातो. मात्र, पती-पत्नी सुशिक्षित आहेत. तसेच त्यांच्या कुटुंबियांनी समजूतदारपणाची भूमिका घेतली. सुनेला सासूने मुली समान वागवलं आणि जावयालाही मुलासारखं प्रेम दिलं, तर नक्कीच अनेक कुटुंब अनेक संसार हे तुटण्यापासून वाचतील यात शंका नाहीच.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default