सहकार मित्र चंद्रकांत हरी बढे सर पतसंस्थेचा राज्यभर कारभार असल्याने येथेदेखील शाखा होती. शाखेत सात लाख रुपयांच्या घोळप्रकरणी पीतांबर चौधरी (रा. बुलडाणा) यांच्या फिर्यादीवरून २०१३ मध्ये पोलिसांत ठेवीदारांच्या ठेवी व त्यांचे हितसंबंधी संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. कालांतराने विविध ठेवीदारांनी ठेवींसंदर्भात बुलडाणा पोलिसांत गुन्हे दाखल केल्याने ८० कोटींच्या वर आकडा समोर आल्याने तेव्हापासून पोलिसांकडील तपास सीआयडी विभागाकडे वर्ग झाला आहे. बुलडाणा शाखेच्या गुन्ह्यांसंबंधी सीआयडीचे पथक वारंवार वरणगाव येथे येऊन गेले. मात्र संचालकांमधील एक व्यक्तीही हाती लागली नसली तरी सर्व संचालक मात्र वरणगाव येथे आपापले व्यवसाय करत होते. त्यांनी पोलिस प्रशासनाचा धाक केव्हाच गुंडाळून ठेवून आमचे कोणी काही करू शकत नाही, आमचे वरपर्यंत हात आहेत, अशी त्यांची भावना होती.
सात संचालकांना अटक
बुधवारी (ता. १५) सकाळीच बुलडाणा येथील पोलिस उपअधीक्षक अनिल पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी शीतल मदणे, पोलिस निरीक्षक शेळके, कुळकर्णी, नाफडे व अमरावती, वाशीम जिल्ह्याचे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या २० जणांच्या पथकाने संचालकांच्या घरांवर छापेमारी करून धरपकड केली. त्यात २७ संचालकांपैकी चंद्रकांत बढे, राजेंद्र चौधरी, भागवत पाटील, बळिराम माळी, भिकू वंजारी, गोविंद मांडवगणे, विजय वाघ या सात संचालकांना वरणगाव पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेऊन बुलडाण्याकडे रवाना केले, तर काही संचालक फरारी होण्यात यशस्वी झाले आहेत. यातील आठ संचालक मृत झाले आहेत तरी या कारवाईमुळे ठेवीदारांना आपल्या ठेवी परत मिळतील, अशा आशा पल्लवित झाल्या आहेत. या वेळी वरणगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक आशिषकुमार आडसूळ, उपनिरीक्षक परशुराम दळवी यांनी सहकार्य केले.
