गुलाबराव पाटील यांच्यावर विश्वास
जळगाव जिल्ह्याने पुन्हा शिवसेनेला धक्का दिला आहे. शिवसेनेचे प्रमुख कार्यकर्ते ठाकरे गट सोडून शिंदे गटात सहभागी झालेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य तसेच काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा राजीनामा दिला आहे. कार्यकर्ते म्हणाले, जळगाव शहर व ग्रामीणचा विकास महत्त्वाचा आहे. त्यासाठी हे राजीनामे दिलेत. जळगाव ग्रामीणचा विकास करायचा असेल, तर गुलाबराव पाटील यांच्याशिवाय पर्याय नाही. ते शिंदे गटात गेल्यानं त्यांच्यासोबत राहणं आवश्यक आहे. तरच आमच्या भागाचा विकास होणार आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांचा समावेश
राज्यात सर्वत्र शिवसेनेचे दोन गट पडलेत. ठाकरे आणि शिंदे गट. शिंदे गटात इनकमिंग सुरू आहे. जळगाव तालुक्यात शिवसेनेला भगदाड पडले. 60 पदाधिकाऱ्यांनी जिल्हाप्रमुखांकडे राजीनामे सोपविले. हे सर्व पदाधिकारी एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले. तालुकाप्रमुखांसह, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्यांचाही यात समावेश आहे. शिवसेनेचा राजीनामा देणारे बहुतेक जण हे गुलाबराव पाटील यांच्यावर विश्वास ठेवणारे पदाधिकारी आहेत. आपल्या भागाचा विकास गुलाबराव पाटील करू शकतात. त्यामुळं त्यांच्यासोबत राहण्यासाठी शिवसेनेच्या पदांचे राजीनामे दिल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणण आहे.
