मंदिरात गेले, प्रसाद संपला, बाहेर आले तर चप्पल चोरीला, महाजनांचा खडसेंवर निशाणा

फुले शाहू आंबेडकर
0
जळगाव : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी कालच विधानपरिषदेच्या आमदारकीची शपथ घेतली. मात्र काही दिवसांपूर्वीच महाविकास आघाडी सरकार कोसळल्यामुळे मंत्रिपदाची आस असलेल्या एकनाथ खडसेंचं स्वप्न धुळीला मिळाल्याचं बोललं जात आहे. त्यातच भाजपचे संकटमोचक नेते आणि खडसेंचे राजकीय वैरी गिरीश महाजन यांनी त्यांना टोला लगावला आहे. मंदिरात गेले आणि प्रसाद संपला, बाहेर आले तर चप्पल चोरीला, अशी खडसेंची अवस्था झाल्याचं महाजन म्हणाले.
गिरीश महाजन काय म्हणाले?

"एकनाथ खडसे आमदार झाले, त्यांना शुभेच्छा आहेत. त्यांना वाटलं होतं, की आपण मंत्री होऊ, खूप चांगलं काम करु, पण राजकारणात सगळ्या गोष्टी मनासारख्या होत नसतात. ते आमदारपदी आले आणि महाविकास आघाडीचं सरकारच गेलं, त्यामुळे त्यांना आमदारकीवरच समाधान मानावं लागणार आहे" असं महाजन म्हणाले 
पंगतीत बसले आणि बुंदी संपली, असं खडसेंविषयी लिहिल्याचं मी सोशल मीडियावर ऐकलंय. त्याहून पुढे जाऊन, मंदिरात गेले आणि प्रसाद संपला, बाहेर येऊन पाहिलं, तर चप्पल चोरीला, अशी अवस्था एकनाथ खडसेंची झाली आहे, पण हा योगायोग आहे. सोशल मीडियावर अशा अनेक गोष्टी लिहिल्या जातात. पण हे त्यांच्यामुळे झालं किंवा अपशकुन झाला, असं मी म्हणणार नाही" असा टोला महाजनांनी लगावला.
बुंदीवरुनही डिवचलं

"मुक्ताईनगरचे अपक्ष विधानसभा आमदार चंद्रकांत पाटील आणि खडसेंचं गाढं प्रेम आहे" असं उपरोधिकपणे गिरीश महाजन म्हणाले. चंद्रकांत पाटील यांनी राजकीय शत्रू असलेल्या खडसेंना डिवचण्यासाठी मतदारसंघात काही दिवसांपूर्वी बुंदी वाटली होती. "पंगतीत बसले आणि बुंदी संपली" या सोशल मीडियावर व्हायरल मीमवरुन टिपण्णी करण्यासाठीच पाटलांच्या कार्यकर्त्यांनी बुंदीवाटप केले होते. त्यावरही गिरीश महाजन यांनी भाष्य केलं. "कोणी लाडू वाटतं, कोणी पेढे वाटतं, त्यांनी बुंदी वाटली, ग्रामीण भागात लोकांना बुंदी आवडते. त्यांची बुंदी संपली, मात्र यांच्या ताटात बुंदी पडली" असंही महाजन म्हणाले
दरम्यान, आमच्यासोबत युती केली म्हणून २०१९ मध्ये शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले, असा दावाही गिरीश महाजन यांनी केला. मी शिवसेनेला त्यावेळीच सांगितलं होतं, की आमच्यासोबत युती केली नाहीत, तर तुमचे दोनसुद्धा खासदार निवडून येणार नाहीत. भाजपने तुम्हाला संपवलं नाही, पण तुम्हाला दुर्बुद्धी झाली आणि तुम्ही नैसर्गिक युती तोडलीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचे फोटो लावून तुम्ही मतं मागितलीत, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत तुमचे ५५ जण निवडून आले, पण निकालानंतर तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसलात. त्या दिवसापासून तुमचं काऊण्टडाऊन सुरु झालं, त्यामुळेच तुमच्यावर ही वेळ आली. तुम्ही कोणाला भेटला नाहीत, खुर्चीची हवा तुमच्या डोक्यात गेली, मूळ हेतूपासून दूर गेल्याने तुमचे सगळे आमदारही नाराज झाले, अशी टीका गिरीश महाजनांनी शिवसेनेवर केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default