मिळालेल्या माहितीनुसार, विष्णू इंगळे याची मुलांच्या हत्येप्रकरणी २९ जून रोजी निर्दोष मुक्तता झाली होती. त्यानंतर कारागृहाबाहेर येताच विष्णूने झाडाला दोर लावू गळफास घेत आत्महत्या केली. या गंभीर घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केलीय.
विष्णूवर काय होते आरोप ?
१० मे २०१८ रोजी अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलिस स्टेशन हद्दीतील धोतर्डी हे गाव तिहेरी हत्याकांडाने हादरले होते. आरोपी विष्णु दशरथ इंगळे याच्या पत्नीचे निधन झाले होते. त्यामुळे विष्णू नैराश्यात होता. याच मानसिक तणावातून विष्णूने त्याच्या तीन मुलांची हत्या केली असल्याचा आरोप होता. अजय इंगळे (१७), मनोज इंगळे (१५ ) आणि शिवानी इंगळे (१२) अशी हत्या झालेल्या मुलांची नावं आहेत. या तिघांना विष पाजून त्यांची पाटा वरंवंट्याने मारह डोके ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याचा आरोप विष्णूवर होता. त्यानंतर पोलिसांनी आरोपी विष्णू विरोधात कलम ३०२, ३०९ नुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती.
सदर गुन्ह्याचा तपास केल्यानंतर पोलिसांनी न्यायालयात आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकार पक्षातर्फे १६ साक्षीदार तपासण्यात आले. तर आरोपीचे वकिल देवानंद गवई यांनी उलटतपासणीत साक्षीदारांचे म्हणणे खोडून काढले. त्यानंतर आरोपीला पोलिसांनी खोट्या गुन्ह्यात अटक केली,हे सिद्ध झाले. बचाव पक्षाचे वकिल आणि सरकार पक्षाचे युक्तीवादानंतर सबळ पुराव्या अभावी न्यायालयाने आरोपीची निर्दोष सुटका केली.
