अमरावतीत नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याने उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. उमेश कोल्हे यांची हत्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याने झाल्याचे काल अमरावती पोलिसांनी देखील पुष्टी दिली. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आदेश देऊन या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपावला आहे. तसेच आतापर्यंत या प्रकरणात सर्व आरोपीेंना पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर आता शहरातील १० लोकांना नुपूर शर्माबद्दल पोस्ट शेअर केल्याने जीवे मारण्याच्या धमक्या आल्या, असा गंभीर आरोप भाजप नेते व खासदार अनिल बोंडे यांनी केला आहे.
शहरातील डॉ. गोपाल राठी यांनीही पोस्ट शेअर केल्या होत्या. त्यामुळे डॉ. राठी यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत माफी मागितली. 'माझ्यामुळे कोणत्या धर्मातील लोकांच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो. यानंतर अशी चूक होणार नाही', असंही डॉक्टर राठी यांनी आपल्या माफीनाम्यामध्ये म्हटलं आहे. त्यानंतर बोंडे यांनी ज्यांना धमक्या आल्यात त्यांची अमरावती पोलिसांनी चौकशी केली नाही असा आरोपही केला आहे. तर धमक्या आलेल्या सर्व लोकांच्या चौकशी केल्या पाहिजे, अशी मागणी देखील बोंडे यांनी यावेळी केली. मात्र, अमरावतीच उमेश कोल्हे यांचं प्रकरण देशभरात गाजत असताना अमरावती पोलीस दिरंगाई का करीत आहे असा सवाल उपस्थित होत आहे.
