गावोगावी निवडणुकांचं धुमशान, ६०८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर, सरपंचांची निवड मतदार करणार

फुले शाहू आंबेडकर
0
मुंबई : पावसाचे प्रमाण कमी असलेल्या विविध ५१ तालुक्यांतील ६०८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका येत्या १८ सप्टेंबरला घेण्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी शुक्रवारी येथे केली. नागरिकांचा इतर मागास प्र्वगाच्या (ओबीसी) आरक्षणासह तसेच राज्य सरकारने केलेल्या कायद्यानुसार यावेळी सरपंचाची थेट जनतेतून निवड करण्यात येणार आहे.
कमी पर्जन्यमान असलेल्या भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर घेण्याचा आदेश आदेश सर्वोच्च न्यायालयाने गेल्या मे महिन्यात दिला होता. त्यानुसार पावसामुळे निवडणूक कार्यक्रम बाधित होण्याची शक्यता कमी असलेले ५१ तालुके निवडून तेथील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. समर्पित मागासवर्ग आयोगाने शिफारस केलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात या निवडणुकांसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा राखीव असतील. त्याचबरोबर निवडणूक कार्यक्रमाच्या कोणत्याही टप्प्यावर अतिवृष्टी किंवा पूर परिस्थितीसारखी नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास त्याबाबत राज्य निवडणूक आयोगास तात्काळ अहवाल सादर करावा, असे आदेशही संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे मदान यांनी सांगितले.

निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हा व तालुकानिहाय संख्या:

नंदुरबार: शहादा- ७४ व नंदुरबार- ७५.

धुळे: शिरपूर- ३३.

जळगाव: चोपडा- ११ व यावल- २.

बुलढाणा: जळगाव (जामोद), संग्रामपूर, नांदुरा तालु्क्यात प्रत्येकी एक, चिखली- ३, लोणार- २.

अकोला: अकोट- ७ व बाळापूर- १.

वाशीम: कारंजा- ४.

अमरावती: धारणी- १, तिवसा- ४,

अमरावती- १ व चांदुर रेल्वे- १.

यवतमाळ: बाभुळगाव- २, कळंब- २, यवतमाळ- ३, महागाव- १, आर्णी- ४, घाटंजी- ६, केळापूर- २५, राळेगाव-११, मोरगाव- ११ व झरी जामणी- ८.

नांदेड: माहूर- २४, किनवट- ४७, अर्धापूर- १, मुदखेड- ३, नायगाव (खैरगाव)- ४, लोहा- ५, कंधार- ४, मुखेड- ५, व देगलूर- १.

हिंगोली: (औंढा नागनाथ)- ६.

परभणी: जिंतूर- १ व पालम- ४.

नाशिक: कळवण- २२, दिंडोरी- ५० व नाशिक-१७.

पुणे: जुन्नर- ३८, आंबेगाव- १८, खेड- ५ व भोर- २.

अहमदनगर: अकोले- ४५.

लातूर: अहमदपूर- १.

सातारा: वाई- १ व सातारा- ८.

कोल्हापूर: कागल- १

निवडणूक कार्यक्रम.. संबंधित तहसीलदार १८ ऑगस्ट रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करतील. तर २४ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी २ सप्टेंबर रोजी तर नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत ६ सप्टेंबर असेल. मतदान १८ सप्टेंबरला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default