अमरावतीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अमरावतीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण काही इसमांना पोलिसांचं भय राहिलेलं नाही. ते भर रस्त्यात, चौकात छोट्या-मोठ्या वादातून गोळीबार करत असल्याचं उघड झालं आहे. या वाद आणि गोळीबारामुळे सर्वसामान्यांच्या सुरक्षेचं काय? असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण तशीच घटना अमरावतीत घडली आहे. शहरात दोन तरुणांच्या वादात थेट गोळीबार झाला आणि या गोळीबारात 13 वर्षीय शाळकरी मुलीला गोळी लागली आहे.
अमरावतीत तरुणांच्या वादातून गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या गोळीबारात शाळेतील एका विद्यार्थीनीच्या पायाला गोळी लागली आहे. जखमी विद्यार्थीनीला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. पण या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.
संबंधित घटना ही आज संध्याकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास घडली. अमरावती शहरातील इतवारा भागातील पठाण चौक चाराबाजार परिसरात संबंधित घटना घडली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन तरुणांमध्ये वाद झाला. याच वादातून गोळीबार झाला. या गोळीबारावेळी 13 वर्षीय शालेय विद्यार्थीनीच्या पायाला गोळी लागली. ही मुलगी शाळा सुटल्यानंतर घरी जात होती. पण दरम्यान रस्त्यात गोळीबार झाला आणि तिच्या पायाला गोळी लागली. या प्रकरणातील आरोपींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे. त्यामुळे पोलीस आता नेमकी काय कारवाई करतात ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.
