नंदुरबार जिल्ह्यात गेल्या २४ तासापासून पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नदी नाल्यांजवळील भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने शेतांमध्ये पुराचे पाणी आल्याने पीक पाण्याखाली आले आहे. नदी नाल्यांना पूर आल्याने अनेक गावांना जोडणाऱ्या लहान फरशी पुलावरून पाणी जात असल्याने दळणवळण ठप्प झाले आहे. त्यामुळे तुफान पावसामुळे जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
नंदुरबार जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. त्यामुळे शेती कामांना ब्रेक लागला आहे. नैदणी, कोळपणी, औषध फवारणी, पिकांना खत देणे इत्यादी कामे खोळंबल्याने पिकांची वाढही खुंटली आहे. संततधार पावसामुळे धरणे व नदी नाल्यांना मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. जिल्ह्यात पाणीसाठा उपलब्ध झाला असला तरी अति प्रमाणात झालेल्या पाऊस पिकांसाठी धोकादायक ठरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
