सांगली : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी संबंधीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. याचा प्रत्यय पुन्हा एकदा समोर आला आहे. सांगली जिल्ह्यात दीड महिन्यापूर्वी एका महिलेचा मृत्यू झाला होता. या महिलेच्या मृत्यूसंदर्भात एक मोठा खुलासा झाला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण -
मीना बाळासाहेब जावीर (वय 38) या महिलेचा दीड महिन्यांपूर्वी मृत्यू झाला होता. ही महिला आटपाडी शहरातील विद्यानगर येथील रहिवासी होती. या महिलेच्या मृत्यूचा गुंता सोडविण्यास आटपाडी पोलिसांना दीड महिन्यांनी यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी राजेंद्र बबन पांढरे (वय 33, रा. गोटेवाडी ता. तासगाव), हर्षदा शिवाजी लांडगे (20, रा. साठेनगर, आटपाडी) आणि योजना दत्तात्रय पाटील (32, रा. विद्यानगर, आटपाडी) यांना अटक करण्यात आली आहे. तिच्याकडून वारंवार होणारा अपमान आणि त्रासाला कंटाळून तिला बिअरमधून विषारी द्रव्य पाजण्यात आले आणि तिचा खून करण्यात आल्याचे तपासादरम्यान समोर आले आहे.
मृत मीना जावीर खासगी कंपनीत मार्केटिंगचे काम करत होती. याच कंपनीत संशयित रवींद्र पांढरे, हर्षदा लांडगे, योजना पाटील हेदेखील काम करत होते. मीना ही रवींद्रकडे वारंवार पैशांची मागणी करत होती. तसेच पैसे दिले नाहीत तर बदनाम करण्याची धमकी देत होती. यामुळे रवींद्रच्या मनात तिच्याबद्दल राग निर्माण झाला होता. तर हर्षदा आणि योजना या दोघींनाही मीना कंपनीतील काम करताना वारंवार अपमानास्पद बोलत होती. यामुळे या तिघांच्या मनात मीनासंदर्भात भयंकर राग निर्माण झाला होता.
संपूर्ण प्रकाराला कंटाळून मीना संदर्भात मनात असलेल्या रागामुळे या तिघांनी तिला संपवण्याचाच निर्णय घेतला. त्यानुसार २४ जून रोजी रवींद्रने तासगाव येथील कंपनीच्या कार्यालयात बिअरमधून विषारी द्रव्य देऊन तिला संपविण्याचा कट रचला. त्यानुसार त्याने सोबत आणलेली विषारी द्रव्याची बाटली हर्षदाला दिली. 27 जूनला रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास हर्षदा व योजना या दोघी मीनाच्या घरी गेल्या व त्यांनी तिला बिअरमध्ये विषारी द्रव्य मिसळून पिण्यास दिले. तिने ही बियर प्यायल्यानंतरही त्या लगेच निघून गेल्या नाहीत. तर बियर पिल्यानंतर ती मृत झाल्याची खात्री झाल्यावरच त्या तिथून गेल्या
असा झाला खुलासा -
दरम्यान, मीनाच्या मृत्यूनंतर तिच्या भावाने आटपाडी पोलिसात फिर्याद दाखल केली होती. मात्र, पोलिसांना याबाबत शंका होती. म्हणून पोलीस कसून चौकशी करत होते. या तपासादरम्यान, घटनास्थळावरील पंचनामा केला. तसेच पोलिसांनी त्यावेळचे कॉल डिटेल्स तपासले. यानंतर पोलिसांनी राजेंद्र बबन पांढरे (वय 33, रा. गोटेवाडी ता. तासगाव), हर्षदा शिवाजी लांडगे (20, रा. साठेनगर, आटपाडी) आणि योजना दत्तात्रय पाटील (32, रा. विद्यानगर, आटपाडी) यांना अटक केली आहे
