भोकर येथील दिपक बर्डे हा तरुण गेल्या बारा ते तेरा दिवसापासून बेपत्ता होता. त्याच्या बेपत्ता असल्यामागे घातपात असल्याचा संशय त्याच्या वडिलांनी व्यक्त केला होता. त्यानंतर ३१ ऑगस्ट रोजी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्या आरोपींना अटक केली.
सदर प्रकरणात आरोपींना अगोदर सात दिवस पोलीस कोठडी मिळाली. त्यानंतर १३ तारखेपर्यंत पुन्हा न्यायालयाने पोलीस कोठडी दिल्यानंतर आरोपींनी दिपकची हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिल्याच अप्पर पोलिस अधिक्षक स्वाती भोर यांनी सांगितलं. मुस्लिम मुलीशी विवाह केल्यामुळे तरुणाची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे.
दिपकच्या घरच्यांना अजुनही त्याची आस लागून आहे. घराचा एकुलता एक दिपक हिरावून घेतल्याने त्याचा घातपात ज्यांनी केला, त्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी त्याचे कुटूंबीय करत आहेत. दिपकच्या विरहाने त्याचे आई - वडील आजारी पडले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, आरोपींनी दिपकची हत्या केली असल्याची कबुली दिली असली तरी अद्याप दिपकचा मृतदेह सापडला नसल्याने पोलीसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. तीन दिवसांपूर्वी भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वात श्रीरामपुरात भव्य जनआक्रोश यात्रा काढण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी मयत दिपकचा मृतदेह शोधण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू केले आहे.
