अमळनेर
एखाद्याचे नशीब बलवत्तर असले तर साक्षात यमराज देखील त्याचे काही वाकडे करू शकत नाही असाच अनुभव चोपडा तालुक्यातील कोळंबा येथील महिलेच्या बाबतीत आला. बिबट्यापासून बचाव करण्यासाठी तापी च्या पुरात उडी मारली अन बुडत्याला केळीच्या खोडाचा आधार मिळाला अन तिचे प्राण वाचले.
कोळंबा येथील लताबाई दिलीप बाविस्कर (कोळी) ही महिला ९ रोजी सकाळी तिच्या मालकीच्या तापी नदी काठावरील शेतात शेंगा तोडायला गेली होती. साधारणतः अकरा वाजेच्या सुमारास एक कुत्रा तिच्या दिशेने धावत येताना दिसला आणि त्याच्या मागे बिबट्या शिकार करण्यासाठी पळत होता.
लताबाई ने हे दृश्य पाहताच ती घाबरली. बिबट्या आपल्यालाही खाईल या भितीने तिने तापी नदीत उडी मारली. तापी नदीला पूर आला होता. लताबाईला पोहता येत असल्याने ती पोहू लागली आणि तिला केळीचे खोड वाहताना दिसले. लताबाईने त्या खोडाचा आधार घेतला. चोपडा तालुक्यातून वाहत वाहत लताबाई अमळनेर शिवारात आली.
पाडळसरे धरण ओसंडून वाहत असल्याने त्याच्यावरून नदी पार करून निम शिवारात नदी काठाला लटकली मात्र ती गळीतगात्र झाल्याने ती केळीच्या खोडाला धरून तशीच रात्रभर काठावर लटकून होती. १० रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास निम मांजरोद दरम्यान नाव चालवणारे शंकर कोळी नदीवर आले असताना त्यांना एक महिला काठावर लटकलेल्या अवस्थेत दिसली.
सुदैवाने लताबाई चे नातेवाईक निम गावात होते. तिकडे सोशल मीडियावरून लताबाई बेपत्ता झाल्याचा संदेश निम पर्यंत पोहचला होता. म्हणून लताबाईचा भाचा अशोक गटलू कोळी याला नदी काठावर आपली आत्या असल्याची खात्री झाली. तेथे जाऊन गावकऱ्यांच्या मदतीने त्याने लताबाईला बाहेर काढले. तिला मारवड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केल्यावर डॉक्टर निखिल पाटील यांनी प्रथमोपचार केले.
