मेळघाटातील धारणी येथील २३ वर्षीय तरुणीला अकोट येथून शेख रईस या तरुणाने पळवून हैदराबाद येथे नेले व मौलानाच्या घरी नेऊन बळजबरीने विवाह केला. या तरुणीला जीवे मारण्याच्या धमक्या देऊन तिच्याशी बळजबरीने हैदराबाद येथे एका मौलानाच्या घरी विवाह केला, त्यानंतर पीडित तरुणीला बळजबरीने मुस्लीम धर्म परिवर्तनसाठी प्रवृत्त केले. गोमांस खाण्यासाठी बळजबरी केली जात होती असा आरोप पीडित तरुणीने केला आहे. अखेर शेख रईस बाहेर गेल्याची संधी साधून या तरुणीने आपली आपबिती आईला फोन वरून सांगितली. ३ दिवसांपूर्वी तिला नातेवाईकांनी तिची कशीबशी सुटका करून तिला घरी आणले, आता ही तरुणी सुखरूप असून तिने आपल्यावर होत असलेली अत्याचाराची माहिती प्रसार माध्यमांसमोर मांडली.
युवतीला बळजबरीने पळवून नेल्यानंतर घटनेची तक्रार धारणी पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. मात्र धारणी पोलिसांनी या प्रकरणात कमालीचा हलगर्जीपणा केला असा आरोप भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी केला. मुलीला जबरदस्तीने पळवून नेणाऱ्या शेख रईस व त्याला सहकार्य करणाऱ्या कुटुंबातील सदस्यांवर कारवाई करून त्यांना अटक करावी अशी मागणी भाजप नेते खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी केली आहे.
