मध्यरात्रीनंतर सायकलीवरून मृतदेह नेत टाकला नदीत
मध्यरात्री दोन ते अडीच वाजेदरम्यान घरात जावून पडलेली जमिनीवर सांडलेले रक्त पुसले. तसेच कापूस भरण्याच्या पोत्यात सत्यवान याचा मृतदेह टाकून त्यास सायकलीवरून गिरणा नदीत वाहत्या पाण्यात फेकून दिले. दरम्यान, शनिवारी (ता. १७) सकाळी दहाला विजय महाजन यांना फोन करून गावाबाहेरील म्हसोबा मंदिराजवळ भेटण्यास बोलवले व गावातील चर्चेबद्दल सांगून या संशयितास कासोदा पोलिसात स्वतः जमा होऊन जा, असे सांगितले. परंतु संशयित हा शेतात निघून गेला व तेथून फरार होण्याच्या मार्गावर होता. उत्राण येथे हत्या झाल्याचे कळताच उपविभागीय पोलिस उपअधीक्षक भारत काकडे व सहाय्यक पोलिस निरीक्षक नीता कायटे यांनी घटनास्थळाला भेट दिली.
असा झाला खून निष्पन्न
मृतदेह भातखेडे येथील गिरणा नदीच्या काठावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह फुगलेल्या व कुजलेल्या अवस्थेत शुक्रवारी (ता. १६) आढळून आला. भातखेडे येथील धनराज पाटील हे अस्थी विसर्जनासाठी गावातील नदी काठावरील महादेव मंदिराजवळ गेले होते. त्यावेळी त्यांना उंबराच्या झाडाजवळ मृतदेह आढळला. त्यावेळी त्यांनी ही घटना उत्राण येथील पोलिस पाटील रेखा पाटील यांना सांगितली.
त्यानंतर रेखा पाटील व गावातील काही मंडळींनी घटनास्थळी धाव घेतली. या मृतदेहाबाबत त्यांनी कासोदा पोलिस ठाण्यात माहिती दिली. त्यानंतर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. परंतु दुसऱ्या दिवशीच सहाय्यक पोलिस निरीक्षक नीता कायटे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवायला सुरुवात केल्यावर तो अकस्मात मृत्यू नसून खून झाल्याचे निष्पन्न झाले. कासोदा पोलिसांनी तपासचक्रे फिरवून संशयित भगवान महाजन यास अटक केली.
