मुंबई जवळील विरारमध्ये धक्कादायक घटना उजेडात आली आहे. पतीने पत्नीला घाबरवण्याच्या नादात गळफास लाऊन घेतला. गळफास बसल्यामुळे त्यातच त्याचा मृत्यू झाला. पत्नीने उसणे घेतलेल्या 2 हजार रुपयातील 500 रुपये कमी दिल्याने रागाच्या भरात मरण्याची धमकी देऊन गळफास घेण्याचा दिखावा करत असताना फास लागून पतीचा मृत्यू झाला. सदर घटनेची विरार पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली आहे.
विरार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत भगवान रामजी शर्मा (वय 35) आणि त्याची पत्नी चांदणीदेवी (वय 25) विरार पूर्वेतील वीर सावरकर मार्ग परिसरातील लक्ष्मी निवास या ठिकाणी 7 दिवसांपूर्वी रहायला आले होते. हे दोघेही भाईंदर येथील एका खासगी कंपनीत काम करत होते.
भगवान शर्मा याच्याकडून त्याच्या पत्नीने नविन कपडे घेण्यासाठी 2 हजार रुपये उसणे घेतले होते. त्यातून तिने केवळ 1500 रुपये 500 परत केले. आणि 500 रुपये नंतर देते सांगितले. याचा राग आल्याने त्याने पत्नीने घेतलेले नविन कपडे फाडून आत्महत्या करण्याची धमकी देत नविन कपड्यातील एक कपडा घेत बेडरुममध्ये जाऊन गळफास लाऊन घेण्याचा बनाव आणत असताना फास लागून त्याचा मृत्यू झाला. दरवाजा उघडत नसल्याने पत्नीने शेजाऱ्यांना बोलावून दरवाजा तोडला असता सर्व प्रकार समोर आला. विरार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचानामा करत अकस्मात मृत्यूची नोंद केली.
